महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या व समर्पित वृत्तीने समाज घडविणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या चाणक्य मंडळ परिवाराच्या संचालिका रोहिणीताई गुट्टे-नागणे यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे व्यासपिठावर उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीला धुमाळ, वृषाली कडलग व अशोक शेटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. व्ही-स्कुलमध्ये योगदान देऊन पंचायत समितीचे नाव राज्यभरात पोहोचवणाऱ्या तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ आयोजित निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धेत विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतून प्रथमच ‘एन.एम.एम.एस’ शिष्यवृत्तीधारक झालेली खांडगाव शाळेतील सायली विठ्ठल खरे, दिव्यांग असूनही दहावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल बिरोबा विद्यालय रहिमपूरची श्रावणी बाबासाहेब वाळुंज, ‘एन.एम.एम.एस’मध्ये पहिला दिव्यांग शिष्यवृत्तीधारक झालेला श्रमशक्ती मालदाड विद्यालयाचा विद्यार्थी भालेराव वेदांत भीमराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख आंबेडकर, दशरथ धादवड, साखरे, भागवत, केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे, अशोक गोसावी, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजू राहणे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुनील ढेंरगे, आदर्श शिक्षक विलास आवारी, गोरक्षनाथ भोकनळ, अश्विनी मेहेर आदी उपस्थित होते.


