महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात म्हणजेच प्रत्येकी 100 रुपयात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. दसरा मेळाव्या आधीच घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे
शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी
तोंडावर आल्याने कमी कालावधीत वस्तूंचा पुरवठा करावा,
यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची
खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे :
-
शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार – (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)
-
आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार ( मदत व पुनर्वसन विभाग)
-
पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घर बांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार – (गृह विभाग )
-
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. खर्चास मान्यता ( नगर विकास सुधारित विभाग)
-
भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता – (जलसंपदा विभाग)
-
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा – (जलसंपदा विभाग)


