महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून १७३४ जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी दिली.
सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्यात आला. यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने उल्लेखनीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसे भरावेत? त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे? शाळा, महाविद्यालय यांनी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे? विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कशा प्रकारे सादर करावेत? ऑनलाइन अर्जांचा भरणा कसा करावा? त्यानंतर काय प्रक्रिया अंवलबिण्यात यावी.
या विषयांवर साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थी, पालक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राहाता, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर व कोपरगाव या याठिकाणी २ ते ३ तालुक्यांच्या समावेशासह कार्यशाळा घेण्यात आल्या. या कालावधीत विशेष त्रुटी पूर्तता मोहीम राबविण्यात आली. मोहीमेत २०० प्रकरणांमध्ये प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.
भविष्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना अहमदनगर येथे येऊन अर्ज करण्याचा त्रास होऊ नये यासाठी तालुकास्तरावर प्रमाणपत्र अर्ज स्विकृती व वाटप शिबीरे घेण्यात येतील. यातून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
कसे चालते समितीचे कामकाज
https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. निवडणूक, सेवा व शैक्षणिक कारणास्तव जातपडताळणी समित्यांकडे अर्ज करता येतो. समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांकडे एससी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या जातप्रवर्गासाठी अर्ज करता येतो. जात प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी समितीला किमान पाच महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, ही प्रक्रिया ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन झाली आहे. समितीकडे दावा सादर केल्यावर जाती दावा सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित अर्जदाराची आहे. अर्जदारांनी जाती दावा प्रस्ताव दाखल करताना स्वतःचा नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन भरलेल्या मूळ अर्जाची प्रत व त्यासोबत सर्व कागदपत्रे व त्यांच्या सुस्पष्ट छायांकित प्रती या सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर समिती कार्यालयात अर्जदारांनी महाविद्यालयाच्या मार्फत ३० दिवसांच्या आत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहनही समिती अध्यक्ष विकास पानसरे यांनी केले आहे.
समितीचे कामकाज कोण पाहते
“रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स, बंगालचौकी, बुरुडगल्ली, अहमदनगर येथे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज चालते. जिल्हा जातपडताळणी समितीवर तीन सदस्यांचा समावेश आहे. समितीत अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे, सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे हे कामकाज पाहतात. याशिवाय समितीला क्षेत्रीय चौकशीकामी सहाय्य करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई यांचा समावेश असलेले दक्षता पथक कार्यरत असते.”

