महाराष्ट्र संवाद न्यूज
नोकरी निमित्त बाहेरगावी असलेल्या पोलिसाच्या दोन दुचाकी जाळण्याची घटना शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरात घडली. घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
अज्ञातांकडून शहरात दुचाकी जाळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यातील अज्ञात आरोपींचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांची उकल पोलीस उपाधीक्षकांचे पथक करत असले तरी या पथकालाही दुचाकी जाळणाऱ्यांचा शोध घेता आलेला नाही.
सध्या ठाण्याच्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या आणि भातसा धरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या व संगमनेरच्या ढोलेवाडीमध्ये राहणाऱ्या पोलीस नाईक राजेश सावित्रा माळी यांच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याचे समोर आले आहे शहर पोलीस ठाण्यात माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माळी आपल्या दोन्ही दुचाकी घरासमोर लावून झोपी गेले होते. पहाटेच्या वेळी दोन वाजता त्यांच्या मुलीस जाग आल्याने घरासमोर लावलेल्या दुचाकी जळत असल्याचे दिसून आले त्यामुळे माळी यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलीस व अग्निशामक दलास बोलावून घेतले घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाने जळणाऱ्या दुचाकी विझविल्या. आपल्याच सहकारी बांधवाची वाहने पेटवून दिल्याचे समोर येऊन देखील संगमनेर पोलिसांना आरोपीचा अद्याप तपास लागू शकला नाही.
पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह
शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे तसेच आता दुचाकी जाळण्याच्या देखील घटना घडू लागल्यात. दुचाकी, चारचाकी जाळण्याचे नाशिक सारख्या शहरातील लोन आता संगमनेरात येऊन धडकले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी सोबतच आता कायद्याचे रक्षक समजल्या जाणाऱ्या पोलिसांचीदेखील वाहने यातून सुटलेली नाहीत. पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने वेगळ्याच कार्यात व्यस्त असलेले पोलीस नेमके करतात तरी काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.


