महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे पारंपारिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य राहणार आहे. नव्या धोरणानुसार यापुढे पॉलिटेक्निकचे (तंत्रनिकेतन) शिक्षण मातृभाषेत दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित लघु उद्योग भारतीच्यावतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणार्या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांना यावेळी गौरविण्यात आले.
मंत्री पाटील म्हणाले, देशात आता औद्योगिक क्रांती घडू लागली आहे, या क्रांतीचा वेग वाढवायचा असेल तर संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पाऊल उचलले असून डिसेंबरअखेर पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून करण्यात येईल.
राज्यात या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाची अध्ययन सामुग्री मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षकांना आवश्यक उपकरण उपलब्ध करून देणार असून त्यांनी इंग्रजीतून शिकवले तरी विद्यार्थ्यांना ते मातृभाषेतून समजणार आहे.
३१ हजार विद्यार्थ्यांनी निवडला मातृभाषेचा पर्याय
राज्यातील ३५० पॉलिटेक्निक महाविद्यालयांपैकी १७१ महाविद्यालयांमधून ३१ हजार विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा पर्याय निवडला आहे. सरकारच्या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता येणे शक्य होणार असल्याने यंदा प्रवेश वाढतील. २०१७ मध्ये पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये केवळ ४० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती, मात्र आता शंभर टक्के प्रवेश पूर्ण होतात.
डॉ. अभय वाघ
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक


