महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले असले तरी संगमनेरात गेल्या काही महिन्यात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या संगमनेर तालुक्यातील जनसेवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ३४४ प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांमध्ये लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारी ५०२ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३४४ प्रकरणे तहसीलदारांनी मंजूर केली. उर्वरित प्रकरणांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या. त्यामुळे या त्रुटी दूर करून ही प्रकरणी पुन्हा नव्याने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
समाजातील वंचित घटकासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जातो. यासाठी शासनाच्या योजना गावागावात वाड्या वस्त्यांवर पोहोचविण्यासाठी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात जनसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. या जनसेवकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा शोध घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करत त्यांना या योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. राज्यात नवे सरकार येण्यापूर्वी अशा प्रकारचे ५०० हून अधिक प्रकरणे संबंधितांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती.
तहसीलदार निकम यांनी बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १५६, इंदिरा गांधी अंतर्गत १३१, आणि श्रावणबाळ योजना अंतर्गत ५७ प्रकरणे मंजूर केली आहेत.


