महाराष्ट्र संवाद न्यूज
पठार भागातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथील मृत झालेल्या चार भावडांच्या कुटूंबियांचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत या कुटूंबियांचे सांत्वन केले.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्यावतीने त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे विजेचा धक्का बसून चार भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात येताच बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जि. प. सभापती मीरा शेटे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, सरपंच शिवाजी फणसे, प्रकाश भालके, सुनंदाताई भागवत, जयराम ढेरंगे, गौरव डोंगरे, गणेश कजबे आदींसह खंदरमाळवाडी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले की,
चार बालकांचा असा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना सर्वांचे हृदय हेलकावून टाकणारी आहे. आम्ही सर्वजण या कुटुंबाबरोबर आहोत. ज्या कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच या घटनेचा सखोल तपास व्हावा. विशेषत: पावसाळ्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत असतात. त्यामुळे अशा घटना पुन्हा-पुन्हा होऊ नये सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून याकडे वीज मंडळांने गांभीर्याने पाहत यावर ठोस कृती आराखडा करावा. तसेच सरकारच्यावतीने या दोन्ही कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



