रविवार विशेष :-
२०२०-२०२१ या आर्थिक वर्षांची देशासह जगाकरिता अतिशय अडचणीचे वर्ष म्हणून इतिहास नोंद घेईल, नव्हे तर या शतकातील सर्वात अडचणीचे वर्ष म्हणून संबोधले जाईल चर्चा होती. केवळ ‘करोना’ या गंभीर आजाराच्या साथीबाबत एका बाजूला असे चित्र निर्माण झाले की जणू काही आता जगाचे विकासाचे चाक थांबणार मात्र हेच वर्ष संगमनेर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या काळात करोनाची तीव्र लाट असतानाही पुणे-नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वेची घोषणा करीत त्यासाठी लागणाऱ्या निधीची महाराष्ट्र सरकारने तरतूद केली.
हा प्रकल्प सुमारे सोळा हजार कोटींचा असून तो २२० किलोमीटर लांबीचा असून हा रेल्वेचा मार्ग पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जात आहे यात संगमनेर शहरालगतच ‘संगमनेर रेल्वे स्टेशन’ होणार असून त्यासोबत मालधक्का सुद्धा उभारला जाणार आहे. सदर प्रकल्पाचे काम केंद्र व राज्य सरकार मिळून करणार आहे या प्रकल्पासाठी जमीन मोजणीचे काम आता अंतिम टप्प्यात असून मोजणी पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल त्याकरिता थोडीशी वाट पहावी लागेल. अशाप्रकारे संगमनेर तालुक्याने अनेक वर्षे वाट पाहीलेली रेल्वे प्रत्यक्षात उतरणार आहे.
त्यामुळे संगमनेर तालुका हा रेल्वेच्या भारताच्या नकाशावर स्थान मिळवेल यात आता कुठलीही शंका नाही. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड मुंबई’ करणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे झाल्यानंतर संगमनेरकरांचा थेट पुणे व पुढे चेन्नई पर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असतानाच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी अजून एका नवीन ‘ग्रीनफिल्ड हायवे’ची घोषणा केली, त्याचे नाव सुरत-अहमदनगर- चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्प असे देण्यात आले.
संपूर्ण नवी आखणी असलेला (greenfeild alignment) सुमारे चार राज्यातून जाणारा हा महामार्ग पहिल्या टप्प्यात सुरत ते अहमदनगर असा पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता सुमारे ५० हजार कोटी रुपयांची तरतूद भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांनी केलेली आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेची संगमनेर तालुक्यात प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. संगमनेर तालुक्याच्या पूर्व उत्तर भागातून जाणारा हा रस्ता भविष्यात मैलाचा दगड ठरणार आहे. यात कोणतीही शंका नाही. या रस्त्याने संगमनेर तालुक्यातील वाहतूक संपर्क हा थेट सुरतला जोडला जाईल. पुढे हा रस्ता दिल्ली-मुंबई द्रुतगती ग्रीन फिल्ड आठ पदरीने जोडला जाईल. त्यामुळे थेट दिल्ली करीता मार्ग सुकर होणार आहे.
यामुळे संगमनेर तालुक्यातील भाजीपाला दूध इतर पदार्थ थेट गुजरात, मध्य प्रदेश,राजस्थान, दिल्ली आदी राज्यात कमी वेळेत पोहोचणार आहे. या एका रस्त्यामुळे संगमनेर तालुका हा अनेक राज्यांनी जोडला जाणार आहे. याबाबत नुकतीच संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन रस्त्याचे स्वरुप अंतिम केले असून त्याबाबतच्या त्रुटी दूर करून रस्त्याकरिता पूर्ण सहकार्य करणार आहे असे सांगितले. या दोन्ही प्रकल्पाची चर्चा करीत असताना संगमनेर तालुका हा पायाभूत प्रकल्पाचे बाबतीत नशीबवान म्हणावा लागेल. मग त्यात सन २००८ मध्ये तालुक्यातील वडझरी व लगतचे काकडी विमानतळाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या महाराष्ट्र सरकारच्या कंपनीचे माध्यमातून पूर्ण करून त्याचे उद्घाटन सन २०१८ मध्ये महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते करण्यात आले. आज हे विमानतळ महाराष्ट्रातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विमानतळामध्ये येते, हे इथे अभिमानाने नमूद करावे लागेल.
सोबतच संगमनेर तालुका आता थेट जगाशी जोडला गेला आहे. या विमानतळावरून मुंबई-दिल्ली-बेंगलोर-चेन्नई-हैदराबाद आदी ठिकाणांहून विमानांची ये-जा सुरू आहे. याच बरोबर सन २०१० मध्ये कामाला सुरुवात झालेला संगमनेर बाह्यवळण रस्ता व पुणे-नाशिक रस्त्याचे खेड-सिन्नर चौपदरीकरण याचे संगमनेर तालुक्याचे भूसंपादन व रस्त्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून रस्ता वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. याची दखल थेट दिल्लीपर्यंत घेण्यात आली. या खेड-सिन्नर रस्त्यामुळे संगमनेर तालुक्याचा संपर्क हा दक्षिणेतील राज्यांशी थेट जोडलेला आहे. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीकरिता लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी ही नेहमीच उपयोगात येते, हे नाकारून चालणार नाही. अशा प्रकारे संगमनेर तालुक्याचे भवितव्य उज्ज्वल असून या तालुक्यातील सर्व रहिवाशांना याचा शैक्षणिक, शेती, व्यापार आदीकरिता व तालुक्याच्या प्रगतीकरिता वरील सर्व पायाभूत प्रकल्पांचा उपयोग होईल.
प्रशांत गुंजाळ, ९८९०१७२७११
लेखक संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वकील आहेत.

