महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये येथून ‘ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं’ अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाने मुरजी पटेल यांना लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याचे बोलले जाते.
सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील वादासंदर्भात महाराष्ट्र सैनिकांनी कोणतेही भाष्य करू नये, योग्य वेळ आल्यावर मी यासंदर्भात बोलेल, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार देऊ नये अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
राज ठाकरे पत्राद्वारे नेमके काय म्हणाले
प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न
लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
आपला मित्र,
राज ठाकरे

दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंनी चांगल्या भावनेने पत्र पाठवले. या जागेवर भाजपने उमेदवार दिला आहे. त्यामुळे हा निर्णय माझा एकट्याचा असू शकत नाही. याबाबत पक्षाच्या नेत्यांशीदेखील चर्चा करावी लागेल. सत्तेतील मित्रपक्ष शिंदे गटाशी (बाळासाहेबांची शिवसेना) बोलावं लागेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

