महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीद्वारे देखील सामान्य व्यक्ती करोडपती होऊ शकतो. अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत, असे प्रतिपादन म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग यांनी केले.
भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार येथील श्री सिद्धिविनायक कार्पोरेशनतर्फे आयोजित सुतारांसाठीच्या कौशल्य निर्मिती ‘संवाद ‘ प्रशिक्षण कार्यशाळेत सुतारांनी आर्थिक नियोजनाचे धडे गिरविले. ‘भारतीय अर्थव्यवस्था व सामान्य गुंतवणूकदारांचे संपत्ति निर्माण’ या विषयावर कडलग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायकचे संचालक संदीप चोथवे तर अतिथी म्हणून ग्रीन प्लाईचे व्यवस्थापक राहुल साहू, मेरीनो लैमिनेट्सचे शाखा व्यवस्थापक जितेन्द्र पाटील, यूनिकोलचे नायर उपस्थित होते.
कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत ही जागतिक पातळीवरील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०२९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकाची होण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संपत्ती निर्माणासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड एसआयपीच्या व एकरकमी गुंतवणुकीच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही करोडपती होऊ शकते. मात्र, ही स्वप्न आपण पाहिली पाहिजेत.
२०२१-२२ मध्ये लोकांची बचत २०२०-२१ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी घटलेली असतानाही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मात्र तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण होत असल्याने व बँकेमधील मुदत ठेवीचे दर घसरलेले असल्याने सामान्य गुंतवणूकदारही म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत.
भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री, जागतिक बाजारातील रुपयाची घसरण, महागाईमध्ये झालेली वाढ असे असूनसुद्धा किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढत आहे. जूनमध्ये एसआयपी खात्यांची संख्या ५.५५ कोटींच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचलेली आहेत. एवढेच नव्हे तर एसआयपीच्या माध्यमातून येणारी गुंतवणूक १२,२७६ त्यांच्या कोटी रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचली आहे.
जगात आर्थिक मंदी मंदावत असतानाही भारत ‘ब्राईट स्पॉट’ ठरत आहे असे प्रशंसोदगार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काढले आहेत. सामान्य गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून महिन्याला केवळ शंभर रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकतो. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी तर आभार ग्रीन प्लायचे निलेश जोशी यांनी व्यक्त केले.
आपले कौशल्य आणि कष्टाद्वारे सुतार चांगल्या प्रमाणात पैसा कमवत आहेत. मात्र त्या पैशाचे आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान नसल्यामुळे भविष्यात त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संदीप चोथवे, संचालक, सिद्धिविनायक.

