महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे चार भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर बर्डे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी (ता. १७ ऑक्टोंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील अकलापुरमध्ये जाऊन या कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तात्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे तुटून पाण्यात पडलेल्या विज वाहिनीचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे या चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तालुक्यातील हा भाग ज्या मतदारसंघात येतो त्या भागाचे आमदार डॉ. किरण लहामटे, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात या बड्या नेत्यांसह अनेकांनी आत्तापर्यंत या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले, मदतीच्या घोषणा केल्या. मात्र या कुटुंबीयापर्यंत अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याची माहिती मिळते.
अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार किरण लहामटे यांच्यासह सोमवारी या ठिकाणी भेट देत बर्डे कुटुंबांचे सांत्वन केले. घटनेची माहिती घेत यावेळी त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी संपर्क करत या कुटुंबीयांना ‘शबरी’ योजनेतून दोन घरकुले देण्याची केली मागणी.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कपील पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, डॉ. दत्तात्रय हांडे, अकलापूरचे माजी उपसरपंच व विश्वस्त संतोष देवकर, विश्वस्त शिवाजी तळेकर, संपत आभाळे, अशोक वाघ, आंबी खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, विकास शेळके, सुहास वाळुंज, गौरव डोंगरे, बाळासाहेब कुर्हाडे, रघुनाथ आभाळे, पांडुरंग कुरकुटे, घारगावचे माजी सरपंच सुरेश गाडेकर, हॉटेल लक्ष्मीचे मालक आमीर शेख, संदीप आभाळे, विशाल वाणी, मुन्ना शेख, बाळासाहेब कुरकुटे, दिनेश पावडे आदी उपस्थित होते.


