महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन सह मोठ्या प्रमाणात सर्वच पिके वाया गेली आहेत. शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या कार्यालयाबाहेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या सरकार विरोधी घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना दिले.
नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, संतोष हासे, विजय रहाणे, राजेंद्र चकोर, आनंद वर्पे, बादशहा वाळुंज, जावेद शेख, जयराम ढेरंगे, संतोष नागरे, सुनील कडलग, रामनाथ कुऱ्हे, तात्या कुटे, राजेंद्र खेमनर, शहाजी खेमनर, शिवाजी गोसावी, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, ऋतिक राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका एक परिवार म्हणून राज्यात परिचित आहे. यावर्षी तालुक्यात सर्वत्र चांगला आणि जोराचा पाऊस झाला आहे. यामुळे सोयाबीनसह सर्व पिके वाया गेले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत मिळायला हवी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
इंद्रजीत थोरात म्हणाले, नुकसानग्रस्त शेती पिकांचे सरसकट पंचनामे करावेत ही आमची मुख्य मागणी आहे. सरकारने केवळ घोषणा न करता आवश्यक ती मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहिजे.

काय होती आंदोलकांची मागणी
संगमनेर तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे देखील नुकसान झाले. खरिपाची पिके वाया गेली. याचा मोठा आर्थिक फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने तालुक्यातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसने हे आंदोलन केले.

