मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मताधिक्याने विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींना पराभूत करेल, असे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 
काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर बुधवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी खरगे यांचे अभिनंदन करत ही प्रतिक्रिया दिली. 
बाळासाहेब थोरात म्हणाले, नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना 50 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून या कारकीर्दीत त्यांनी पक्ष संघटना व सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे. पक्षाने त्यांना दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. आपल्याला मिळालेल्या पदाचा त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर केला. ते महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली.
यावेळी त्यांच्यामधील नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य जाणून घेता आले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी घेईल.
काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी यांनी अत्यंत कठिण काळात पक्षाची धुरा सांभाळून देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करत लोकशाही विरोधी ताकदींशी लढा दिला. आम्ही समस्त काँग्रेसजन त्यांचे आभारी आहोत. सोनियाजी गांधी आमच्या सर्वांसाठी अखंड ऊर्जेचा प्रेरणा स्त्रोत आहेत. राहुलजी गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी विभाजनकारी आणि विषमतावादी शक्तींविरोधात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशव्यापी जन आंदोलन उभारले आहे, ही यात्रा इतिहास घडवणार आहे. 
सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली देशात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

