महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
दीपावलीच्या पहील्या दिवशी वसुबारसेला म्हणजेच गोपाष्टमीला शुक्रवारी सकाळी संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गो ग्राम परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ही गो ग्राम परिक्रमा आणि गो पूजन सकाळी सात वाजता पार पडले.
वसुबारसेला अतिशय श्रद्धेने गोमातेचे पूजन केले जाते, अशा पवित्र गोमातेचे रक्षण करणे हे आपले हिंदू धर्मीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. सद्यस्थितीत देशभरात हजारोंच्या संख्येने गोमातेची कत्तल होत असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोमातेला सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने तो कसायांना गाई विकतो.
शहरात आपल्याला गाई पाळणे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाई वाचवणं आपल्या हातात आहे. गोमाता कामधेनु आहे. तिच्या सगळ्याच गोष्टींचा मानवाला अतिशय उपयोग होतो.
पंचगव्याच्या आधारे निर्माण झालेल्या वस्तू वापरून आपण शेतकऱ्याला हातभार लावू शकतो व गोमातेचे रक्षण करू शकतो.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पंचगव्याच्या आधारे निर्माण झालेल्या वस्तू आपण सगळ्यांनी वापराव्यात यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू असल्याची माहिती ज्ञानेश्वर मंदिर, चंद्रशेखर चौक येथे देण्यात आली.
गो- ग्राम परिक्रमा अकोलेनाका येथून सुरू झाली. मेनरोड, तेलीखुंट, बाजारपेठ, लाल बहादूर चौक, कॅप्टन लक्ष्मी चौक, रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक येथील राम मंदिर येथे गो-मातेची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.


