महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
गोमातेपासून आपणास दूध मिळते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुग्ध व्यवसायावर चालतो. वसुबारसेला गोमातेचे पूजन करणे ही आपली परंपरा व संस्कृती आहे. जसा बैलपोळा साजरा होतो तशीच संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी होत असते. मात्र यावर्षी लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी कारण पशुधनाचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामध्ये अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते गाय पूजन करून वसूबारस साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, संतोष मांडेकर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स मॅनेजर गणपतराव शिंदे, संकलन प्रमुख भाऊसाहेब आहेर, सुनिल राउत आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या दूध संघामध्ये दरवर्षी वसुबारस साजरी केली जाते. लंम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गाय गोठ्यांची स्वच्छता, गोचीड निर्मूलन, गायींची स्वच्छता, जंत निर्मूलन आदी बाबीची प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेऊन आपल्या पशुधनास सकस आहार दिला पाहिजे. राजहंस दूध संघाच्या वतीने गाईंच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. येथील संस्कृती इतरांसाठी आदर्शवत ठरली आहे.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारे यांनी केले तर उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

