महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळविला आहे. विरोधकांनी उमेदवार दिला नसला तरी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांपैकी एकही उमेदवार दोन हजाराचा पल्ला गाठू शकला नाही.
शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडा नंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक देशभर चर्चिली गेली. विविध कारणांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फुटी नंतर प्रथमतः उद्धव ठाकरे गटाने हे मोठे यश मिळविले आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. पोट निवडणुकीआधीच शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ही दावा केला होता. यामुळे शिवसेनेतील दोन्ही गटांमधील वाद न्यायालयात गेला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत दोन्ही गटाला नवीन चिन्ह आणि नाव दिले होते. 
ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण, ऋतुजा या मुंबई महापालिकेत नोकरी करीत होत्या. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना महापालिकेतील नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यांनी तो दिला. पण, महापालिकेकडून तो स्विकारण्यात आला नाही. अखेर हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेव्हा न्यायालयाने राजीनामा मंजूर करण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानंतर शेवटच्या दिवशी ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने मात्र उमेदवार दिला नाही. त्यांनी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपला पाठिंबा दिला. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांना पत्र लिहिले. त्यात मागणी केली की ऋतुजा
यांना बिनविरोध निवडून द्यावे आणि आपला उमेदवार मागे घ्यावा. त्याची दखल घेत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, ठाकरे गटाला सहानुभूती मिळू नये तसेच पहिलाच मोठा विजय प्राप्त झाल्यास त्या गटाचे मनोबल वाढेल ही बाब लक्षात घेऊन राजकीयदृष्ट्या भाजपने उमेदवार मागे घेतला. भाजपने उमेदवारी मागे घेतली पण अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार न घेतल्याने ऋतुजा यांच्यासह रिंगणात एकूण ७ उमेदवार राहिले. परिणामी, या निवडणुक झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे केवळ ३१ टक्केच मतदान झाले.
दरम्यान, भाजपने उमेदवारी माघार घेतल्यानंतर प्रचार मात्र नोटाचा केल्याचे बोलले जात आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर लटके यांच्या विजयाचा मार्गही अडचणीचा ठरु शकतो. त्यामुळे उघडपणे उमेदवार मागे घ्यायचा मात्र पडद्यामागे नोटाचा प्रचार करुन ठाकरे गटाच्या अडचणी वाढवायचा अशी रणनिती भाजपची असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला गेला होता. मात्र आज झालेल्या मतमोजणी नंतर लटके यांचा विजय झाला असून दुसऱ्या क्रमांकाचे मते नोटाला मिळाली.
उमेदवार निहाय पडलेली मते :
श्रीमती ऋतुजा लटके – 66530 (विजयी)
बाला नाडार – 1515
मनोज नायक – 900
श्रीमती नीना खेडेकर – 1531
श्रीमती फरहाना सय्यद – 1093
मिलिंद कांबळे – 624
राजेश त्रिपाठी – 1571
नोटा – 12806
एकूण मते – 86570


