महाराष्ट्र संवाद न्यूज
संजय राऊत यांच्या धाडसाचं तसेच त्यांच्या कुटुंबीयांचही कौतुक वाटतं. संजयला बेकायदेशीररित्या पत्राचाळ प्रकरणात अडकवण्यात आल. मी न्यायदेवतेचे आभार मानतो, कारण त्यांनी योग्य तो न्याय केला. या प्रकरणावरून सिद्ध झाले की केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत आहे.
खासदार राऊत यांनी जामीनावर सुटल्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. खासदार राऊत यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत विचारले. 
ठाकरे म्हणाले, जो संकटाच्या वेळी उभा राहतो तो खरा मित्र असतो. संजय माझा खरा मित्र आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख मी आता अरे तुरे असा करतोय. संजय जे काही करायचं असेल ते उघडपणे आणि परखडपणे करतो. तुम्हाला वाटत असेल तो देवेंद्र फडणवीस आणि मोदी, शहा यांना भेटणार म्हणजे काहीतरी वेगळ सुरू आहे. पण संजय राऊतला तिकडे जाऊन मांडवलीच करायची असती तर तो शंभर दिवस तुरुंगात राहिलाच नसता. उलट संजय राऊत यांनी दाखवून दिले की, न घाबरता जिंकू शकतो. त्यांनी देशासमोर उदाहरण उभे केले आहे.
आम आदमी पक्ष, तेलंगणामध्ये केसीआर, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन हे देखील भाजप विरोधात लढत आहेत. हे सर्वजण एकत्र आले तर देशात किती मोठी ताकद उभे राहील याची भाजपला कल्पना आलेली नाही.
केंद्रीय यंत्रणा सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे. ज्याच्या अंगावर जा म्हटलं की त्याच्या अंगावर जात आहेत. केंद्रीय यंत्रणांची अशी स्थिती असताना न्यायव्यवस्थेला देखील आपल्या अंकित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. केंद्रीय कायदा मंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यामधून याचे संकेत मिळतात. त्यामुळे देशातील लोकांनी आता या विरोधात आवाज उठवला पाहिजे. संजय राऊत यांना खोट्या केसेस मध्ये पुन्हा गोवले जाऊ शकते, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राऊतांना आदित्य ठाकरे यांनी मारली मिठी
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जात ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या स्वागतासाठी आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित होते. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना मिठी मारत त्यांचे स्वागत केले. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर प्रथमतः असे एखाद्या नेत्याचे स्वागत झाले असावे. असे देखील बोलले जात आहे.

