महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राजकारणातली कटूता संपली पाहिजे. एका पक्षाने ठरवून ती संपणार नाही. सर्वांनीच ती संपवली पाहिजे. पण सोबतच नेत्यांनी शांत राहायचं आणि कुणाला तरी बोलायला सांगायचं ही प्रथा पण बंद झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
गुरुवारी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकारणातील कटूतेवर भाष्य केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकारणातील कटुता संपवायला हवी’ या आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत खासदार राऊत यांना चिमटा काढला आहे.
खासदार राऊत यांच्या जामीनाबद्दल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, न्यायालयाने निर्णय दिला आहे. तो योग्य की अयोग्य यावर ईडी बोलेल, ते उच्च न्यायालयात गेले आहे. त्या विषयावर बोलणे माझ्याकरता योग्य होणार नाही. कोर्टाचं झालं की त्यावर बोलू.
वन नेशन वन इलेक्शन बद्दल प्रतिक्रिया देताना याला समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. सगळ्या निवडणुका एकत्र झाल्या तर खर्च वाचेल. त्यामुळे राजकीय पक्षांना देखील सोयीचे राजकारण करण्याऐवजी भूमिका घेऊन जनतेसमोर जावे लागेल. 
सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले कबर परिसरातील बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट करत ते न्यायालयाच्या आदेशावरून सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

