महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 जणांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.
हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखविणे असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान विवियाना मॉल मधील चित्रपटाचा शोध बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकांने शो बंद पाडल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले होते तसेच कोण जितेंद्र आव्हाड अशी विचारणा केली होती. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार आव्हाड यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीन दिवसाचा कालावधी उरकल्यावर आज वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.
या संदर्भात स्वतः आव्हाड यांनी सलग तीन ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, दुपारी साधारण एक वाजता मला वर्तक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल.
याशिवाय तिसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, हा पॉलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

आव्हाडांच्या अटकेचे स्वागत; महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन करणार
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. तसेच, या अटकेचे मी स्वागत करते असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देवाप्रमाणे आहेत. जर शिवाजी महाराजांबद्दल कोणी चुकीचे सांगत असेल आणि त्याविरुद्ध जितेंद्र आव्हाड आवाज उठवत असतील, त्यामुळेच हे सरकार त्यांना तुरुंगात टाकत असेल तर आम्ही सगळेच तुरुंगात जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू. महाराष्ट्राचे आन-बान शान आणि आमचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांबद्दल जे चुकीचे दाखवण्यात येत आहे, त्याचं जर हे सरकार समर्थन करत असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे असे देखील सुळे म्हणाल्या.

