महाराष्ट्र संवाद न्यूज
कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यात येतो आणि जातो असे घडत नसते. ती काही जादूची कांडी नाही. फिरवली की आला आणि गेला. कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आरोप कोणीही करू शकतो. मात्र आमचे सरकार उद्योगाला चालना देणारे उद्योगांचे स्वागत करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आणखीन एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, तीन-चार महिन्यांपासून गेल्या अडीच वर्षात प्रलंबित असलेल्या कामांना चालना देण्याचे काम आमच्याकडून सुरू आहे. विकास प्रकल्पांना वॉर रूममध्ये घेतले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जातोय. राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि थांबलेल्या प्रकल्पांना पुढे नेणे हे काम सुरू आहे.
शिवसेना-भाजपा युतीचे बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार विकास कामांना प्राधान्य देणारे सरकार आहे. तीन चार महिन्याच्या कालावधीत आम्ही काय केले हे आगामी काळात आपणास दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला अस्वस्थ केले आहे की या सरकारमध्ये मोठे उद्योग आणि रोजगार निर्मिती केली जाईल.
याशिवाय पंतप्रधानांनी 225 विकास कामांसाठी दोन लाख कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच त्याचे लोकार्पण करणार असल्याचे ते म्हणाले.
खासदार राहुल गांधी आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले याबद्दल त्यांना विचारले असता यावर संजय राऊत मोठे नेते आहेत असे सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.
आव्हाड यांच्या अटकेमागे राजकीय हस्तक्षेप नाही
जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामध्ये कोणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

