महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळविले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या मुलाने केले. कोणताही व्यवसाय न करता ठाकरेंची करोडची संपत्ती कशी असा सवाल करत महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्याने ते अस्वस्थ झाल्याची टीका भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत शनिवारी झालेल्या कांदिवलीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सावंत उपस्थित होते.
भातखळकर म्हणाले, स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरु केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले असून मुंबईच्या विकासाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच आहे. ठाकरेंचे कर्तुत्व असे आहे की त्यांच्या नावातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हटवायला हवे. अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केले मात्र याची बातमी सामनामध्ये आली नाही.
मुंबईतील मेट्रोच्या वाढत्या खर्चाला केवळ उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा एकदाही घराबाहेर पडले नाही. अशावेळी केवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराबाहेर पडून समाजासाठी काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरे डॉक्टर असून त्यांच्यामुळे अडीच वर्ष घरात बसलेले आता घराबाहेर पडू लागले आहेत. आता त्यांचे आजारपण कुठे गेले असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला.
खासदार शेट्टी म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी आवाज उठविला आहे. मुंबई महापालिका फायद्यात येण्यामागे भारतीय जनता पक्षाचे योगदान आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी महापालिकेतील टेंडर सिस्टीम बदलावे लागणार असून भाजपच्या सदस्यांनी महापालिकेत शिवसेनेवर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे.
आमदार पाटील म्हणाले, मुंबई महापालिकेत तीन लाख करोड रुपयांचा गैरव्यवहार केवळ एका कुटुंबामुळे झाला. घराणेशाही चा फायदा एका विशिष्ट घराण्याला झाला आहे.

