महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. महा विकास आघाडी सरकारच्या काळातील चुकांमुळे राज्यात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उद्योजकांशी काहीही देणे-घेणे नव्हते. शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळणारे ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांचे आमदार देखील त्यांना सोडून गेले तर त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील उद्योग बाहेर का जाणार नाही असा प्रश्न उपस्थित केला.
राज्यात गुंतवणूक व्हायचे असेल तर उद्योजकांचे चर्चा करायला मुख्यमंत्री उपलब्ध असायला हवे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री दीड वर्ष मंत्रालयात फिरकले नाही. सचिवांना देखील त्यांच्या भेटीसाठी वाट बघावी लागत असे. मुख्यमंत्री कोणाच्या भेटीसाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या. उद्योजकांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या. करार केले जात नव्हते. पर्यावरणाच्या परवानग्या दिल्या जात नव्हत्या. उद्योजकांचे शंका निरसन होत नव्हते, पर्यायाने एकापाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आलेले असताना त्यांच्या पक्षांमध्ये चैतन्य निर्माण होण्याऐवजी काँग्रेसचे लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. कोल्हापूर, सातारा, ठाणे, मीरा-भाईंदर आदी ठिकाणच्या काँग्रेस मधील लोकांनी भाजप प्रवेश केला आहे ही बाब काँग्रेससाठी चिंतनाचा विषय असल्याचे ते म्हणाले.

