महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
खासदार राहुल गांधी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार थोरात यांचेवर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत.
थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे. महाराष्ट्रात देगलूर येथे आगमन झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांना अभिवादन करून सुरू झालेल्या या यात्रेचे राज्यातील जनतेकडून अभूतपूर्व स्वागत झाले आहे.
प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देणारी ही यात्रा असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडीयात्रेप्रमाणे ही यात्रा ऐतिहासीक ठरणार आहे. महात्मा गांधींच्या दांडी यात्रेने देशात क्रांती केली. देश एक केला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून देशहिताची व प्रेमाची ही ऊर्जा एक ऐतिहासिक चळवळ ठरणार आहे. या यात्रेमध्ये साहित्यिक, कवी, संपादक, लेखक यांच्यासह विविध घटकातील लोक सहभागी होत आहेत. गोरगरीब, मजूर, शेतकरी, कष्टकरी महिला यांचा मोठा सहभाग या यात्रेत राहिला असून खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी यात्रा स्वातंत्र्याची दुसरी लढाई ठरणारी आहे.


