महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो पदयात्रेला महाराष्ट्रामध्ये देखील अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेतील महाराष्ट्रामधील शेवटची सभा शेगावमध्ये होत आहे. पदयात्रेमध्ये अहमदनगर मधील पाच हजारावर कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असून शेगाव येथील शेवटच्या सभेसाठी हे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळुंखे आणि समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली.
कन्याकुमारी येथून निघालेली भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये आली आहे. नांदेड हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये जनतेने यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून यात्रेचा शेवटचा प्रवास होणार असून त्यानंतर यात्रा दुसऱ्या राज्यात प्रवेश करणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगावमध्ये होत आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
शेगावमधील सभेत अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्त्यांना नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, करण ससाने, सचिन गुजर आदी काँग्रेसचे पदाधिकारी यासाठीचे नियोजन करत आहे. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या लाल टाकी येथील कार्यालयापासून गुरुवारी (ता. 17) आठ वाजता बस निघणार आहे. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणाहून बसेस निघणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक कार्यकर्त्याला भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांसह पुरोगामी विचाराचे नागरिक, पक्ष, संघटना, साहित्यिक, पत्रकार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उच्चशिक्षित तरुण आणि महिला यांचादेखील मोठा सहभाग राहणार आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व आमदार बाळासाहेब थोरात हे भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक असून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी अत्यंत काटेकोरपणे नियोजन झाले आहे. यात्रेदरम्यान रस्त्यांच्या दुतर्फा लोक मोठ्या संख्येने स्वागतासाठी उभे आहेत. ठिकठिकाणी स्वागत कमानीसह तयार करण्यात आलेले देखावे लक्ष वेधून घेत आहे. याचबरोबर पारंपारिक नृत्य महाराष्ट्र व इतर राज्यांची संस्कृती दाखवणाऱ्या वेशभूषा यामधून सहभागी झालेले युवक युवती यांचा मोठा उत्साह आहे.

