भाजपच्या भूलथापांना संगमनेरकर बळी पडणार नाही
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली शहर ठरले आहे. तत्कालिन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी त्यांच्या कार्यकाळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून जागेचीही निश्चीती केली आहे. त्यामुळे शहरात लवकरच अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार असून यासंदर्भातत भाजपचे पदाधिकारी जनतेला भुलथापा देवून दिशाभुल करत असल्याची टीका कॉग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली.
अश्वारूढ पुतळ्याबाबत बोलताना दिवटे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले आणि सय्यद जावेदभाई जहागिरदार यांनी आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णकृती पुतळा उभारू असे सांगितले. खरे पाहिले तर ॲड. गणपुले आणि जावेद जहागीरदार या दोघांनाही नागरीकांनी नगरसेवक म्हणून संधी दिली होती. ॲड. गणपुले नगरसेवक असतांना राज्यात भारतीय जनता पार्टीचेच सरकार होते. तरीसुद्धा गणपुलेंना म्हाळुंगी नदीवर साधा एक पूलसुद्धा उभा करता आला नाही, की निवडून आलेल्या प्रभागात साईनगरमध्ये एकही काम केल नाही. साईनगरमध्ये नागरिकांना विचारा की, गणपुले नगरसेवक असताना तुमच्याकडे फिरकले होते का? जावेद जहागिरदार यांनी तर प्रत्येक वेळी वेग-वेगळा वार्ड निवडला. त्यांनी चांगले काम केले नसल्यामुळे नागरिकांनी त्यांना दोनदा पराभूत केले. जर त्यांचे काम चांगले असते तर त्यांना असे नाकारले नसते.
याउलट आपल्या कामामुळे माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड त्यांच्या प्रभागातून पाच वेळा निवडून आले. एकदा तर नागरीकांनी त्यांना बिनविरोध नगरसेवक केले. तेव्हा कामांबाबत भाजपने थापा मारू नये. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या तत्कालिन नगराध्यक्ष पदाच्या काळात महात्मा ज्योतीबा फुले, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची उभारणी झालेली आहे. जागेवरून वाद होत होते. ते वाद त्यांनी मिटवुन पुतळ्याची उभारणी केली मात्र याबाबत प्रसिद्धी केली नाही.
कोणत्याही कारणाने भूलथापा मारण्याची भाजपची पद्धत आहे. गणपुले व जावेदभाई लोकांना भुलथापा देऊन फसवू शकत नाही. लोकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून पाहिलेले आहे. नगरसेवक म्हणून तुमचे कर्तुत्व पाहिलेले आहे. जावेद जहागिरदार हे काँग्रेस पक्षाच्या बळावर उपनगराध्यक्ष झालेले असताना काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून लोकांच्या पुढे आता येत आहेत. येथील जनतेला गद्दारी मान्य नाही. लोक तुम्हा दोघांनाही चांगले ओळखतात. नागरिक आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही.
तत्कालीन काँगेसच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी नगरपरिषदेच्या आर्थिक बजेटमध्ये पन्नास लाख रुपयांचा निधी त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून ठेवला आहे व जागेचेही नियोजन केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारला जाणार आहे असेही दिवटे म्हणाले.

