लोकांचा भाजपावर विश्वास वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळु सरकू लागलीय!
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी जागेसह यापूर्वीच पालिकेने ५० लाखाचा निधी मंजूर केल्याचा आणि आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा साकारणार असल्याचा माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे यांच्या विधानाचा माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी समाचार घेत सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
जहागिरदार यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे पालिकेतील कारभार कसा चालतो, याची माहिती देत दिवटेंना ‘माझ्याकडे ट्युशन लावा, म्हणजे पालिकेचा कारभार माहिती होईल’ अशा शब्दात त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली आहे. ४० वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात शहर व तालुक्याचे नेतृत्व करतात. डॉ. सुधीर तांबे पदवीधर मतदार संघाचे आमदार असून दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष आहेत. पालिकेचा कारभार हा बहुमतावर चालतो. तो एखाद्या नगरसेवकाच्या मर्जीने चालत नाही. एवढ्या वर्षात छत्रपतींच्या नांवाने राजकारण करुन तुम्हाला छत्रपतींचा अश्वारुढ बसविता आला नाही. आता शहरातील लोकांचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास वाढतांना दिसत असल्याने आपल्या पायाखालची वाळु सरकली आहे.
५० लाखाची तरतूद केली, यावर जहागिरदार म्हणाले, नगरपालिका दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या कामासाठी करोडो रुपयांची आर्थिक तरतूद करत असते, अशी बोगस तरतुद कितीही करता येते. ३० वर्षात पुतळ्यासाठी जागा मिळाली नाही, आता मात्र लगेच जागा मिळाली आहे. शहरातील कामेदेखील नित्कृष्ठ, दर्जाहिन, कधी पेव्हर ब्लॉक तर कधी क्रॉक्रीट, कधी डांबरीकरण, कधी पाईप गटार तर कधी भुमिगत गटार असा सर्व खेळ सुरु आहे. फिल्टर प्लॅन्ट रिपेअरींगसाठी १ कोटीचा खर्च, ६.५ लाखाचा नदीपात्रातील विहीरीवर खर्च, असे चर्चा करता येण्यासारखे अनेक विषय आहेत.
राज्य शासन व पालिकेचे कायदे वेगळे आहेत. शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर सदर कामासाठी निधी मंजुर होतो. पालिकेत थोरात-तांबे यांची एकहाती सत्ता आहे. विषय बहुमताने मंजुर करतात. नगराध्यक्ष मिटींगचा अजेंठा स्वत:च्या सहिने काढतात. नगरसेवकाला अजेंठा काढण्याचा अधिकार नाही, गणपुले व जहागिरदार यांना सर्व अधिकार असा महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिकेत कायदा नाही, त्यामुळे दिवटेंचे बोलणे पोरकटपणाचे आहे. मी वेगवेगळ्या वार्डात निवडणूका लढलो, दोन वेळेस मी बाहेरच्या वार्डात लढलो कारण माझा वार्ड राखीव झाला होता. बाहेरच्या वार्डात लढण्यासाठी जीगर लागतो. कामे केली किंवा नाही, यासाठी तुमच्या सर्टीफिकेटची आवश्यकता नाही, लोकांना माहिती आहे. निवडणूकीत यश-अपयश हा नशीबाचा भाग आहे. भारतीय टीम जगात भारी परंतु त्यांनाही अपयश येतेच. माणसाने रावणासारखी घमेंड करु नये, वेळ काळ बदलत असते. गद्दार कोण हे सांगायची गरज नाही.
दिवटे आम्ही विषय काय मांडला हे आपल्याला कळायला हवे, आमचा विषय होता, मतदारांनी भाजपला कौल दिला तर संगमनेरात छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभारणार,आपण त्याच विषयावर बोलायला हवे मात्र आपले अपयश झाकण्यासाठी इतर विषयांची मदत घेतली. आम्हाला विश्वास आहे की कॉग्रेस नेतृत्वाच्या भुलथापांना संगमनेरची जनता बळी पडणार नाही. निवडणूकीत भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन अटळ आहे. जनता आम्हाला ह्यावेळेस पुर्ण बहुमताने निवडून देणार आहे. ३० वर्षाच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. आम्हाला कौल मिळाल्यास एक एकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अश्वारुढ पुतळा उभारणार आहोत.

