महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पून्हा एकदा वादग्रस्त विधान करत वाद ओढावून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. केवळ एवढ्यावर थांबतील तर ते राज्यपाल कसले, त्यांनी त्याही पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे सांगत, ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है,’ असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ शनिवारी औरंगाबादमध्ये झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते डी.लिट पदवी देण्यात आली. यावेळी कोश्यारी बोलत होते.
कोश्यारी म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरु चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटत ते त्या-त्या व्यक्तीचे नांव घ्यायचे. मला वाटते की जर कुणी तुम्हाला विचारले की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कोठे जायची गरज नाही. इथेच तुम्हाला महाराष्ट्रात ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरीपर्यत आदर्श असल्याचे ते म्हणाले.
मागच्या वर्षी या दोघांनाही माझ्या हस्ते मानद पदवी देण्यात आली होती. आता पून्हा या दोघांना माझ्या हस्ते डिलीट दिली गेली. आणखी दोन-तीन विद्यापीठाची डिलीट यांना देणे बाकी आहे. तेथील कुलगुरूंना मी म्हणतो की, तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम चांगले आहे, त्यामुळे यांनाच डिलीट द्यायची आहे, म्हणून माझाही नाईलाज होतो. पवार यांनी शेती क्षेत्रात प्रचंड काम केलंय. त्यामुळे ते साखरेपेक्षा अधिक गोड वाटतात. गडकरी तर ध्येय असणारे नेते आहेत, त्यांना रोडकरी या नावानेही ओळखल जात. दोन्ही नेत्यांचे काम मोठे आहे.
राज्यभरातून निषेध सुरु
कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल यापूर्वीही वादग्रस्त विधान केले होते. यावरुन ते चांगलेच वादात सापडले. आता पून्हा त्यांनी छत्रपतींची तुलना राजकीय नेत्यांसोबत केल्याने ते वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राज्यभरातून त्यांचा निषेध सुरु झाला आहे. कोश्यारी यांनी महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीतही यापूर्वी आक्षेपार्ह विधान केले होते.

