महाराष्ट्र संवाद न्यूज
मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण मंत्रीपद आहे, हा अभिनव प्रयोग आहे, असेही त्या म्हणाल्या.
दुसर्या टप्प्यात होणार्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपच्या चार महिला मंत्री असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभेत दोनशेहुन अधिक जागा जिंकण्याचे आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या महिलांमध्ये कर्तृत्व आहे त्यांना संधी मिळेल. अधिकाधिक भाजपच्या महिला आमदार विधानसभेत दिसून येतील असा दावाही त्यांनी यावेळी केला. 
मंत्री संजय राठोड यांच्याबाबत चित्रा वाघ यांना विचारले असता, ‘तेंव्हा ती रस्त्याची लढाई होती. ती मी लढली होती. पण आता न्यायालयात प्रकरण आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे.’ असेही त्या म्हणाल्या. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणार्यांवर कारवाई व्हावी का ?असा प्रश्न चित्र वाघ यांना विचारला असता त्यांनी याचे उत्तर टाळत आमचे सरकार ऑनलाईन नाही तर ऑनफिल्ड सरकार आहे. तसेच फेसबुकवर नसून लोकांच्या चेहर्यावर हसू आणणारे आमचे सरकार आहे. असे सांगितले.

