महाराष्ट्र संवाद न्यूज
दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची घोषणा करत २०६३ पदांची भरती केली जाणार आहे. खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखीने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा, मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबईत जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली. दिव्यांगांसाठी हा मोठा निर्णय समजला जात आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राष्ट्र ठरले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग असला पाहिजे, अशी आमदार बच्चू कडू यांची मागणी होती. हे सर्वसामान्य हिताचे सरकार आहे. ज्या दिवशी कारभार हाती घेतला. तेव्हापासून सरकार हिताचे निर्णय घेत आहे. लाखो रोजगार देण्याचे काम सुरू आहे. ७५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच, नियुक्ती करण्याचा कार्यक्रमसुद्धा घेतला.
तीन टक्के लोक अपंग आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय करत आहोत. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग केला जाईल. यामध्ये २ हजार ६३ पदांची भरती केली जाईल. या विभागाला स्वतंत्र सचिवही असेल. हे सरकार संवेदनशील आहे. आम्हाला भावना कळतात. २४ दिवसांत विभाग झाला आहे. हा काय छोटा मोठा निर्णय नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांचेसुद्धा दिव्यांगांवर प्रेम होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी कोठेही पैसे कमी पडणार नाही, असे सांगितले आहे.
देशातला हा पहिला निर्णय आहे. तसेच दिव्यांगांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे देखील राज्य सरकार मागे घेणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ज्यांच्या संकल्पनेतून दिव्यांग मंत्रालय उभे राहत आहे ते बच्चू भाऊ कधी खोके घेतील का, असा प्रश्न देखील उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

