महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर
गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली नगर जिल्ह्यात राजकारण सुरू असून दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. मंजूर झालेली विकास कामे काही मंडळींच्या व्यक्तिगत हट्टापायी थांबविली जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला अहमदनगर जिल्ह्याचा एवढा राग का आहे असा प्रश्न उपस्थित करत थोरात म्हणाले, सत्तेत असूनही जिल्ह्याच्या हिताच्या आड येणारी ही मंडळी जिल्ह्याचे खरे विरोधक आहे. नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू होती, आज ही विकास कामे ठप्प आहेत. नव्या सरकारने जुन्या सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांना स्थगिती दिली आहे. तर काही मंडळींनी त्याही पुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकास कामांना स्थगिती दिली.
महाविकास आघाडी सरकारने अगदी कोरोना काळातही राज्याच्या विकासाला गतिमान ठेवले होते. जनसामान्यांचे हित लक्षात घेत अनेक प्रकल्प आणि योजनांना मंजुरी दिली होती. वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली राजकीय कारवाया केल्या जात आहे. कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड, खोटे गुन्हे दाखल करून उद्योग व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. या बेकायदेशीर कारवाईमुळे घरे, रस्ते आणि सरकारी विकास कामे सुद्धा बंद पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून अनेक कामगारांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे.
उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणारा निळवंडे प्रकल्प देखील यामुळे रखडला आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला गती दिली होती. अनेक वर्षापासून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी संघर्ष सुरू आहे. मात्र हा प्रकल्प रखडविण्यासाठी आणि दुष्काळी भागाला पाणी मिळू नये, यासाठी तर हे षडयंत्र नाही ना अशी देखील शंका निर्माण होते.
नगर जिल्हा समृद्ध राजकीय परंपरा असलेला जिल्हा आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कारवाया या येथील परंपरेला छेद देणारे आहे राजकारणाच्या नादात संपूर्ण जिल्हाच काही मंडळींनी वेठीस धरला असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री थोरात यांनी केला आहे.

