महाराष्ट्र संवाद न्यूज
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने मंगळवारी संगमनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन देत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदविला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजकीय फायद्यासाठी महापुरुषांविषयी बेताल आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल कोणीही उठतो आणि स्वतःच्या अर्धवट इतिहासाच्या माहितीवर आधारित वाटेल तशी क्रिया, प्रतिक्रिया, वक्तव्य, विधाने महापुरुषांबद्दल करत असतो.
खरंतर आज पर्यंत असं बोलण्याची कोणाचीही मिजास नव्हती. परंतु आता मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांना वारंवार टार्गेट केले जात आहे. थोर महापुरुषांचा वारंवार अपमान या राज्यात केला जातोय. महापुरुषांचा अवमान, अपमान करणाऱ्या अशा नेत्यांना व राजकारण्यांना रोखले का जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बेताल वक्तव्य करणाऱ्या अशा नेत्यांमुळे राज्यात सातत्याने असंतोष निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा विभूतींच्या राज्यात राहून त्यांचाच अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.
आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अमोल निकम यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर कार्याध्यक्ष विजू खरात, युवक तालुकाध्यक्ष योगेश मंतोडे, तालुका संघटक मधुकर सोनवणे, उपशहर प्रमुख शहाणू बेगमपुरे आदींच्या सह्या आहेत.

