महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्यातील ३७ गावांचे गाव कारभारी ठरविण्यासाठी या गावांमध्ये रविवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घुलेवाडी, साकुर, जोर्वे या तुलनेने मोठ्या आणि संवेदनशील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली असून शनिवारी रात्रीच निवडणूक कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले. रविवारी सकाळीच मतदानास सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
रविवारी सकाळीच राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कुटुंबीयांसह जोर्वे येथे मतदान केले.
निवडणुकीमुळे मतदान होत असलेल्या आणि त्या आजूबाजूच्या गावातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. या वेळी पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच निवडीला अधिक महत्त्व आले, त्यातूनच गावोगाव मोठी चुरस निर्माण झाली आहे. बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ता आहे, असे असले तरी अनेक ठिकाणी थोरात यांचे नेतृत्व मानणारे दोन गट नेहमीप्रमाणे समोरासमोर उभे ठाकले आहेत.
पूर्वेकडची काही गावे संगमनेर तालुक्यात असली तरी विधानसभेसाठी राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे तिथे थोरात आणि विखे यांच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झालेला पाहायला मिळतो. 
निवडणुका होत असलेल्या तालुक्यातील घुलेवाडी, साकुर, धांदरफळ बुद्रुक, तळेगाव दिघे या मोठ्या आणि तुलनेने संवेदनशील ग्रामपंचायती मानण्यात येतात. इथल्या निवडणुकीत नेहमीच मोठी चुरस दिसून आलेली आहे. त्यातून अनेकदा वादावादीचे प्रकारही होतात. तळेगाव दिघे येथे तर निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला होता. त्यातून काही दिवस तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
त्यामुळेच प्रशासनाचे या गावांवर बारीक लक्ष आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासह सरपंच पदासाठी निवडणूक होत असलेल्या ३७ पैकी सायखिंडी व डोळासने येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या प्रभागात ७३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ३५ ठिकाणी सरपंच पदासह २९४ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी एकूण १५८ मतदान केंद्र असून तेवढेच मतदान केंद्राध्यक्ष, ३१६ मतदान अधिकारी असे साधारण ८०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी शनिवारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले असून आज रविवारी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन ही निवडणूक प्रक्रिया हाताळत आहे.
मंगळवारी निवडणूक झालेल्या सर्व गावांची एकत्रित मतमोजणी सकाळी दहा वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. जस-जसे निवडणूक निकाल जाहीर होतील तसतसे त्या-त्या गावचे गाव कारभारी देखील निश्चित होतील.

