महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पंढरपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असं धक्कादायक विधान करत शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक असल्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात डॉ. स्वामी यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.
स्वामी यांनी असं विधान करत देशातील व राज्यातील आपल्याच सरकारला घरचाच आहेर दिला असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी शनिवारी (२४ डिसेंबर) पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी ही धक्कादायक विधानं करत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. मोदींनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्यांच प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच ३७० कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केलं असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. 
दरम्यान सध्याच्या परिस्थितीत भाजपातील सर्वच नेते पंतप्रधान मोदींचे गुणगान करत असताना स्वामी यांनी थेट त्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस दाखविले आहे. भाजपला त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने घरचा आहेर दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

