महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : सुसंस्कृत राजकारण आणि सातत्याने होत असलेला येथील विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. सत्ता येते आणि जातेही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा एका दिवसात चित्र बदलेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सर्वांना सोबत घेत आपण तालुक्यात विकासाचा वेग राखला आहे. विकास कामातील सातत्य सुसंस्कृत राजकारण, समाजकारण, प्रगती यामुळे तालुका राज्यात आदर्शवत ठरला आहे. संगमनेरमधील हा विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असतात. यामुळे ते राज्याचे मंत्री आहेत की दोन-तीन तालुक्यांचे, अशी टीका करत ते म्हणाले कितीही अडचणी आला तरी तालुक्याचा विकासाची वाटचाल सुरूच राहणार असून आपल्या गावचा आणि तालुक्याचा विकास साधण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे.
ग्रामपंचायत राजकारणाचा पाया असल्याने आपण कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतला नाही. तरीदेखील आपल्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये चांगले यश मिळविले. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असली तरी निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र आले पाहिजे की आपली परंपरा आहे. मंत्रीपदाच्या कार्यकाळात काम करताना आपण अनेकांना मदत केली. निळवंडे कालवे आणि तालुक्याच्या विकासासाठी निधी आणला. निळवंडेचे पाणी ऑक्टोंबर 22 पर्यंत लाभार्थ्यांच्या शेतात पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र सरकार बदलले आणि गतीने सुरू असलेली ही कामे थांबली.
भारत जोडो अभियान राज्यात आपण यशस्वी केले. राज्य स्तरावर आपल्याकडे मोठी जबाबदारी आहे. अडचणीच्या काळ लवकरच संपणार असून तालुक्याची यशस्वी वाटचाल सर्वांच्या साथीने पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. तांबे म्हणाले,
निवडणुका लोकशाहीमधील अविभाज्य भाग आहेत. तालुक्याला आमदार थोरात यांचे चांगले नेतृत्व मिळाले असल्याने येथील वातावरण अत्यंत चांगले आहे. येथील सहकार, शिक्षण, समाजकारण प्रगतीच्या शिखरावर आहे. हा तालुका इतरांसाठी मॉडेल आहे. निळवंडेसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प थोरात यांनी राबवले असून बाह्यशक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करून तालुक्याच्या विकासात खोडा निर्माण करत आहे.

