महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस सोबत दगा फाटका केला आहे, त्यामुळे सत्यजित तांबेना काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार नसल्याची मोठी घोषणा करत भाजप दुसऱ्याचे घर फोडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यामुळे सत्यजित तांबे आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेसला दिली होती. काँग्रेसने या जागेवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी स्वतः उमेदवारी दाखल न करता मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान करत सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले आहे.
नाना पटोले म्हणाले, नाशिकमध्ये घडलेल्या कालच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून होतो. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींना माहिती देण्यात आली असून ते याबद्दल निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्व पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, प्रमाणे त्यांनी अर्ज न भरणे ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. त्यांनी आपल्या मुलाला अपक्ष उमेदवारी दाखल करायला लावली आहे.
अपक्ष उमेदवारी करून भाजपचा पाठिंबा घेणे ही एक प्रकारची पक्षासोबत गद्दारी आहे. नासिकमध्ये भाजपने उमेदवार दिला नाही यावरून हा सगळा ठरलेला कार्यक्रम होता. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. त्यांना देखील हे सर्व समजते, असेही पटोले म्हणाले.
या सर्व प्रकारामागे भाजपचा हात असून भीती दाखवून घर तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र जेव्हा भाजपच्या नेत्यांची घरे फुटतील तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असे देखील ते म्हणाले. सत्यजित तांबे यांच्या या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाने कोरा एबी फॉर्म दिला होता; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
दरम्यान सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार होता. त्यासाठी कोरा एबी फॉर्म दिला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. म्हणाले माझ्यापर्यंत जी ऐकीव माहिती आली त्यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसते. पक्षश्रेष्ठींनी या प्रकारची दखल घेतली पाहिजे किंबहुना ती घेतली आहे. हा विषय आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील असल्याने कदाचित त्यांना यातील अधिक माहिती असू शकेल. तांबे यांना उमेदवारी दिली असताना त्यांनी फॉर्म भरला नाही. त्यांच्या ऐवजी त्यांच्या चिरंजीवांनी अपक्ष अर्ज भरला. यासंदर्भात पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कोरा एबी फॉर्म दिला होता, त्यामुळे सत्यजित तांबे नाही तो भरता आला असता. त्यांनी अपक्ष अर्ज भरला त्यामुळे हे प्रकरण गंभीर वाटत आहे असे चव्हाण म्हणाले.
आम्ही कोणाची घरे फोडत नाही; हर्षवर्धन पाटील
दरम्यान या संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आले असून, काँग्रेसने एबी फॉर्म दिला मात्र उमेदवाराने उमेदवारी न भरता त्यांच्या मुलाने अपक्ष उमेदवारी केली. हा काँग्रेसचा अंतर्गत गोंधळ आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज का भरला, त्यांना एबी फॉर्म का मिळाला नाही, हे आम्हाला माहिती नाही. भाजपची स्थापना कोणाचे घर फोडण्यासाठी झालेली नाही. तेच भाजपने कोणालाही ऑफर दिलेली नाही. अपक्ष म्हणून तांब्यांनी पाठिंबा मागितला असेल तर त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

