महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक / संगमनेर : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये सात उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये बावीस उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकोणतीस उमेदवारांनी चौरेचाळीस अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सोमनाथ नाना गायकवाड, भागवत धोंडीबा गायकवाड, सुनील शिवाजी उदमले, इंजि. शरद मंगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे आणि छगन भिकाजी पानसरे या सात उमेदवारांचे अर्ज नामंजूर केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.
छाननी नंतर आता निवडणूक रिंगणात बावीस उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार आणि सोमवार हे दोनच दिवस असून त्यानंतर या मतदारसंघातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षाकडून अधिकृत उमेदवार नसल्याने हे दोन्ही पक्ष आता कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात याकडे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांचे चिरंजीव युवा नेते सत्यजित तांबे यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. संभाव्य आमदार असलेल्या सत्यजित तांबे यांच्या मागे कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ मिळते हे देखील येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

