महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई : सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत मातोश्रीमध्ये बैठक सुरू असून या बैठकीमध्ये भाजपकडून लढण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना बळ दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याची अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर भाजपकडून देखील या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली असल्याचा तर्क लावला जात आहे.
त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोर उमेदवारास पक्ष पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सत्यजित तांबे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करण्याचा तांबे यांचा प्रयत्न फोल ठरविण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनीही निवडणूक होऊ देणार नसल्याचे नाशिक मध्ये स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष उमेदवारांमध्ये सामना करणार असल्याचे चिन्ह निर्माण झाली आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीला नाशिक मधील ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित आहे. बैठक सुरू असतानाच बैठकीमध्ये यापूर्वी भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या आणि भाजप व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या धूळ्यातील शुभांगी पाटील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटासह महाविकास आघाडी पाटील यांना पाठिंबा देण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नेमके काय घडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पाटील यांना पाठिंबा दर्शविल्यास उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काय भूमिका घेतात हे बघावे लागेल.

