महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिर्डी : नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोरीवरून कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्याची गरज असल्याचे मत महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी शिर्डी विमानतळावर तिळगुळ देवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये झालेल्या गुप्त चर्चेने निवडणूकीतील सस्पेन्स अधिकच वाढला आहे. 
बीड येथील एका कार्यक्रमास जाण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. या दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ देवून शुभेच्छा दिल्या. भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष दिपक पठारे, राहाता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, शिवाजीराजे धुमाळ आदि उपस्थित होते.
एकीकडे पदवीधर निवडणूकीतील घडामोडी वाढत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री विखे पाटील यांच्यामध्ये शिर्डी विमानतळावर झालेल्या चर्चेचा तपशिल उघड झाला नसला तरी, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेच्या पाठींब्याबाबत सर्वोतोपरी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून पक्षाकडून ज्या उमेदवाराला पाठींबा दिला जाईल. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणाले, या घडामोडींबाबत निष्ठेचे धडे देणाऱ्या बाळासाहेब थोरातांनीच आता खऱ्या अर्थाने खुलासा करण्याची गरज आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील तेव्हा त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजेत.
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व पक्षाच्या विचारांशी फारकत घेवून काम करीत आहे. भारत जोडो यात्रा कॉंग्रेससाठी नव्हेतर राहुल गांधीसाठीच असून, स्वत:ची छबी वाढविण्यासाठीच ही यात्रा आहे. या पक्षातून युवक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. भारत जोडो पेक्षा कॉंग्रेस छोडो हा कार्यक्रम वेगाने सुरु असल्यानेच कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली असल्याची टिका त्यांनी केली.

