महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
कृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांचे विचार आणि जीवन कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक मधुकरराव नवले यांनी केले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. शिक्षक नेते हिरालाल पगडाल कांचनताई थोरात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख अरुण कडू उद्योजक राजेश मालपाणी सुरेश थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नवले म्हणाले, वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांच्याकडे समाज वाचनाचे सामर्थ्य होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यामुळे त्यांनी एकही काम अर्धवट सोडले नाही. आयुष्यभर समाजासाठी समर्पित भावनेने काम करणारे भाऊसाहेब थोरात एक आदर्श व्यक्तिमत्वच नव्हे तर संगमनेर तालुक्यासाठी देव माणूस होते.
मीटर हटाव चळवळ, पाण्यासाठीचा संघर्ष आदीसह समाज विकासाच्या अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी करून दाखविल्या. सहकाराला शिक्षण आणि दुग्ध व्यवसायाची जोड देत त्यांनी संगमनेर सारखा तालुका समृद्ध करून दाखविला. अनेक संकटे आले तरीदेखील त्यांनी आपला विचार सोडला नाही.
वयाच्या उत्तरार्धामध्ये दंडकारण्य अभियाना सारखी अभिनव योजना त्यांनी देशाला दिली. सहकाराच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी तालुक्यातील सामान्यतील सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. समाज हितासाठी समर्पित भावनेने आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करणारे भाऊसाहेब या तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्व ठरले. त्यामुळे तालुक्यातील तरुणांनी इतिहासाकडे पाठ करून महासत्तेचे स्वप्न पाहणे चुकीचे असल्याचे नवले म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार रणजीत सिंह देशमुख यांनी मानले.

