महाराष्ट्र संवाद न्यूज
गावच्या पोलीस पाटलाच्या पुढाकारातून प्रशासनाच्या अजंठावर विषय आल्याने संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील शेत शिवार रस्त्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न महसूल विभागाच्या महत्त्वकांक्षी महा राजस्व अभियानातून अखेर साकार झाले. अभियानातून घर आणि शेतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळाल्याने शेतकरी आनंदित झाले.
सावरगाव तळ येथील विठ्ठल बाजीराव नेहे, जालिंदर सोपान नेहे, शांताराम सोपान नेहे, रावसाहेब यादव नेहे या चार शेतकऱ्यांना घरापर्यंत जाण्यासाठी पायवाट सुद्धा व्यवस्थित नव्हती. तर रघुनाथ लहानु नेहे, नंदराम सीताराम नेहे, बाळासाहेब सिताराम नेहे, रोहित सोमनाथ नेहे, मनाजी मार्तंड नेहे आदि दहा शेतकऱ्यांना त्यांच्या पंधरा हेक्टर शेतीत जाण्या-येण्यासाठी रस्त्याची अतिशय गैरसोय होती.

या शेतकऱ्यांना आपला शेतमाल अंदाजे एक किलोमिटर पर्यंत डोक्यावर वाहतूक करावा लागत असे. यातून या शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत असे. आपल्या गावातील शेतकरी बांधवांची ही अनेक वर्षांची रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पुढाकार घेतला.
यात त्यांनी संबंधित सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांना माहिती कळविली असता त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून या सर्व शेतकऱ्यांना महसूल विभागाचे महाराजस्व अभियानातून हा रस्ता खुला करण्याची एक चांगली संधी असल्याचे शेतकऱ्यांना पटवून दिले. यामुळे या सर्व दहा शेतकऱ्यांनी हा रस्ता तयार करण्यासाठी सहमती दर्शविली.
मात्र रस्ता तयार करताना रघुनाथ नेहे, विठ्ठल नेहे, सोपान नेहे यांचे घरांचे तसेच नंदराम नेहे यांच्या शेततळ्याची अडचण होत होती. परंतु आपल्या जीवनातील ही समस्या कायमची सुटत असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या घरांचा व शेततळ्याचा सुद्धा मागेपुढे विचार केला नाही व मनाचा मोठेपणा दाखवत हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करतांना आपली सक्रिय घरे व शेततळेही या शेतकऱ्यांनी काढून घेतले.
पोलीस पाटील गोरक्ष नेहे पाटील यांच्या पुढाकाराने हा शिवार रस्ता तयार झाल्याने अनेक वर्षांच्या संघर्षदायी जीवनात खऱ्या स्वातंत्र्याची पहाट झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
अमोल निकम तहसीलदार …
तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांचा संप सुरु असताना गावपातळीवरील शासन प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पुढाकार घेऊन महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातून हा शिवार रस्ता तयार करून वाहतुकीला खुला केला ही पोलीस पाटील यांची कामगिरी कौतुकपात्र आहे.

