महाराष्ट्र संवाद न्यूज
शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोराच्या गारपिटीमुळे संगमनेर तालुक्यात बहुतांशी भागात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी व कृषी सहाय्यक आपला संपातील सहभाग कायम ठेवून करणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यात बहुतांशी ठिकाणी जोराचा अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. यामुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले होते.
नुकसानीचे पंचनामे करण्याचा विषय संवेदनशील असल्याने तलाठी व कृषी सहाय्यकांनी सक्रिय पंचनामे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तलाठी व कृषी सहायक यांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद देत पंचनामे करण्याचे मान्य केले. आपल्या मागण्यांसाठी त्यांचा संप सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी या नुकसानीची आकडेवारी पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला माहिती देताना सांगितले.

