महाराष्ट्र संवाद न्यूज
शिक्षकांच्या संपामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांनी शाळेत हजर होऊन सर्व वर्ग चालू करावेत अन्यथा पालकांच्या विनंतीवरून मुलांचे दाखले काढून अन्य खाजगी शाळेत टाकण्याचा इशारा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतच्यावतीने संपकरी शिक्षकांना देण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे पालकांमधून स्वागत होत आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा देखील समावेश आहे. १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू झाले आहे. शाळाच बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसते.
गत दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसला आहे. शैक्षणिक गुणवत्ता कमी झाले असून जिल्हा परिषद शाळेचा पट चांगला राखला जावा, या हेतूने खाजगी शाळा सोडून पालकांनी आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला प्राधान्य दिले आहे. मात्र कोरोना महामारीनंतर आता जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांनी संपाचे हत्यार उपसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू झाले आहे.
एकच मिशन जुनी पेन्शन हा शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठीचा नारा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा ठरू लागला आहे. संपकऱ्यांमुळे विविध कामकाजांवर परिणाम झाला आहे. सरकार संपकऱ्यांबाबत काय निर्णय घेते हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतने उचललेले पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे.
या संबंधीचे मुख्याध्यापकांना पाठविलेले ग्रामपंचायतचे पत्र समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या गावातील शिक्षक या पत्राची किती गंभीरतेने दखल घेतात हे येत्या काही दिवसात समोर येईल.

