अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
वरदहस्त आणि आर्थिक हितसंबंधांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या वाळू तस्करीचा विषय गंभीर बनल्याने ती थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसताना मंगळवारी सकाळी प्रवरा नदी काठावर मॉर्निंग वॉक करणारे पर्यावरण प्रेमी अचानक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करताना तस्करांच्या वाळूने भरलेल्या शेकडो गोण्या पुन्हा नदीपात्रात रिकाम्या केल्या. इतिहासात हा प्रकार प्रथमत:च घडल्याने राजरोसपणे नदीपात्रातून सुरू असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.
प्रवरा, मुळा, म्हाळुंगी अशा नद्यांचा नदी काठ लाभलेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वाळू तस्करीमध्ये गुंतल्याने त्यांना राजकीय वरदहस्त मिळतो. नदीपात्रातील वाळूला सोन्याचे मोल मिळू लागल्याने यातून मोठे अर्थकारणदेखील घडताना दिसते. खालपासून-वरपर्यंत होत असलेल्या हप्ते खोरीमुळे ही तस्करी आणखी पोसली गेली. तस्करी करणारे सफेद कपड्यातले बगळे देखील मालामाल झाले. मिळणाऱ्या वरदहस्तामुळे हे तस्कर थेट अधिकाऱ्यांवरही हल्ले करू लागल्याने अधिकारी देखील कारवाईला धजावत नाहीत, परिणामी त्यांच्यावर आर्थिक संबंधाचे आरोप होतात यात काही अंशी तथ्य देखील असते.
वाळू तस्करांची मुजोरी वाढल्याने ते थेट नागरिकांच्या अंगावर देखील वाहने घालू लागले आहे. यामुळे अनेक नागरिक जखमी, जायबंदी झाले. दोन दिवसांपूर्वी वाळू तस्करी करणाऱ्या एका रिक्षा चालकाने वाळूने भरलेली आपली रिक्षा सुसाट वेगाने नेतांना गंगामाई घाटावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न करून तिला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला नशीब बलवत्तर म्हणून ती महिला बचावली. तस्करांकडून होणारी शिवीगाळ ही या भागात दररोजची झाली आहे. गंगामाई घाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना देखील हे तस्कर आपली वाहने सुखरूपपणे नेता यावी यासाठी, रस्त्यावर लावू देत नाहीत. दादागिरी शिवीगाळ करून ही वाहने नागरिकांना दुसरीकडे लावण्यास भाग पाडले जाते.
वाळू तस्करांच्या दररोजच्या मुजोरीला कंटाळलेल्या मॉर्निंग वॉक करणाऱ्या पर्यावरण स्नेही नागरिकांनी मंगळवारी सकाळी अचानकपणे घाटावर या वाळू तस्करी विरोधात आंदोलन सुरू केले. आंदोलकांकडून अधिकाऱ्यांना फोनाफोनी देखील झाली, मात्र नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी दर्जाचे अधिकारी देखील घटनास्थळी आले नाही. संगमनेर सजाचे तलाठी पोमल तोरणे घटनास्थळी आले. आंदोलकांनी त्यांना देखील धारेवर धरले. वाळू तस्करी विरोधात न्यायालयात प्रकरणे गेल्यास वकीलच आम्हाला वाळू पकडण्याचा अधिकार नसल्याचे सांगतात. मात्र तस्करांच्या हप्तेखोरीत आपण सामील नसल्याचे सांगत आढळल्यास नोकरी सोडण्यास तयार असल्याचे तसेच या परिसरातून वाळू तस्करी होऊ दिली जाणार नसल्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर आंदोलन नागरिकांनी तस्करांनी शेकडो गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या वाळूच्या गोण्या नदीपात्रात रिकामे केल्या आणि या रिकाम्या गोण्या पेटवून दिल्या. तसेच वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षा आणि रिक्षा चालकांना पेटवून देण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. दररोज नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात असताना मंगळवारी मात्र नदीपात्रात पुन्हा वाळू टाकण्यात आल्याचा प्रकार प्रथमत:च घडला.

