श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज
भारत ही जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्याचा परिपक्व विश्वास किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखविल्याने म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) मासिक चलनाने मार्चमध्ये प्रथमच बाजारात अस्थिरता असूनही १४,००० कोटींचा टप्पा ओलांडल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले.
माऊली कृषी उद्योग फाउंडेशनतर्फे आयोजित आरंभ या कृषी व्यावसायिक मित्रांच्या परिषदेत ते ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली कृषी उद्योगाचे संचालक ज्ञानेश्वर उंडे उपस्थित होते.

कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या पाच ते सहा वर्षातच ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल. बाजारातील अस्थिरता ही कधीही कायमस्वरूपी नसते. गुंतवणुकीची नवी संधी ती निर्माण करते,त्याचा लाभ गुंतवणूकारांनी घेतला पाहिजे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारताकडे उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून बघत आहे. देशातील तरुणांची संख्या, कोरोना कालावधीत आरबीआयने कमी केलेल्या व्याजदराने लोकांच्या हातात असलेला खेळता पैसा, बचतीचे महत्व, कोरोनामध्ये जाणवलेली आपत्कालीन फंडाची गरज, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये मिळणारा परतावा, बँक मुदत ठेवीचे घटलेले व्याजदर ह्या सर्व बाबींमुळे भारतीय गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे.
म्युच्युअल फंड उद्योगांमध्ये विक्रमी ५ कोटी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून ह्यात भिशीसारख्या पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करण्याऱ्या स्री वर्गाचा सहभागही वाढला आहे. मार्च २०२३ मध्ये तब्बल ७५ लाख स्त्री गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली. सद्यस्थितीत ४० लाख ४ हजार कोटीचा असलेला म्युच्युअल फंड उद्योग हा येत्या सात ते आठ वर्षात शंभर लाख कोटींचा होईल, अशी शक्यता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी आपली बचत यात गुंतवणुकीत परावर्तित केल्यास संपत्ती निर्माण होईल.
भारतीय बँकामध्ये जवळपास १५० लाख कोटी रुपयांच्या बचत ठेवी आहेत. त्या तुलनेत म्युच्युअल फंडांत फक्त २० टक्के रक्कम आहे, मात्र भविष्यात महागाई निर्देशांकाच्या तुलनेत अधिक परतावा देणाऱ्या मुच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा कल वाढेल. कमी पैशात मोठा जीवन विमा, आपत्कालीन वैद्यकीय खर्चाच्या तरतुदींसाठी आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा व इक्विटीच्या माध्यमातून संपत्ती निर्माणासाठी गुंतवणुकदारांनी तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे असेही कडलग म्हणाले.
ज्ञानेश्वर उंडे म्हणाले, कृषी प्रधान भारतीय संस्कृती ही देशाच्या प्रगतीचा मूळ गाभा आहे. आपण तो जोपासला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी अर्थसाक्षर झाल्यास भारत खऱ्या अर्थाने सामर्थ्य संपन्न होईल. संतोष बनकर, किशोर काळे, मच्छिंद्र मरकड, प्रेम बाभुळके, प्रशांत आढाव यांच्या प्रश्नांना कडलग यांनी उत्तरे दिली. सुत्रसंचलन बाळासाहेब पवार यांनी केले. आभार चैतन्या उंडे यांनी मानले.

