संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
एम्पथी फाउंडेशन, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या योगदानातून मिशन आपुलकी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सारोळे पठारला सुंदर इमारत उभी राहिली आहे. गुणवत्तेबरोबरच शाळेच्या भौतिक विकासाचे येथील हे मॉडेल राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे पठार व धादवडवाडीतर्फे रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वार्षिक स्नेहसंमेलन व मिशन आपुलकी कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्थापिका सुनीता काकड होत्या. मंत्रालय शिक्षण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल भोर, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे, रोटरी आय केअरचे विश्वस्त सुनील कडलग, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वृषाली कडलग, प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका सरस्वती घुले, बाळासाहेब काकड, युवा उद्योजक संदीप फटांगरे, सुनील घुले, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर फटांगरे उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात ग्रामीण विभागात प्रथम आलेला शार्दुल शिवाजी जाधव याचा डॉ. अमोल भोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चौधरी म्हणाले, शासन आणि प्रशासन एकाच नाण्याच्या दोन बाजू असून राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्यांमधून चांगले कामे घडत असतात. त्यासाठी केवळ इच्छाशक्ती आवश्यक असते. अशाच इच्छाशक्तीतून येथे बदल घडला. प्रत्येक मूल ईश्वराची अमूल्य देणगी असते व त्याचे व्यक्तिमत्त्वसुद्धा वेगळे असते. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादून त्याची इतर मुलांशी तुलना करून त्याला शर्यतीचा घोडा बनवू नये.
भोर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या वर्तनात परिवर्तन होऊन ते भारताचे सक्षम नागरिक होऊ शकतील. त्यासाठी त्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना योग्य दिशा द्यावी लागेल. हे शिवधनुष्य येथील शिक्षक लीलया पेलतील.
सुनीता काकड म्हणाल्या, माझ्या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा भव्य दिव्य सोहळा माझ्यासाठी व संपूर्ण ग्रामीण भागातील उत्तर शाळांसाठी अनुकरणीय व दिशादर्शक आहे.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक फटांगरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी गंगाधर पोखरकर, किशोर पोखरकर, मंगेश जाधव, संतोष फटांगरे, दिगंबर फटांगरे, संपत मोरे, चंद्रकांत शिरोळे, अहिल्या घुले, आशा पोखरकर, प्रशांत घुले, विनय फटांगरे, डॉ. सय्यद मोमीन, मंगेश गाजरे, काशिनाथ घुले, कैलास सहाणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण फटांगरे व रवींद्र आगलावे यांनी, आभार ज्ञानेश्वर फटांगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग वाळुंज, शोभा हासे, सुरेखा धराडे , जयश्री बढे यांनी योगदान दिले.

