आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज)
महिलांच्या चळवळीमधून भीमक्रांती अवतरेल. महामानव बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देवून या देशात ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन प्रमुख शत्रू असून यांच्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने त्यांना ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले.
तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आश्वी खुर्द येथे बुधवारी (ता. 3 मे) लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आश्वी परिसरातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविस्मरणीय सोहळा अनुभवला.
कार्यक्रमास्थळी पेटत्या मशालीच्या ज्वाळा व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार टाळ्यांच्या गजरात भगत यांचे मंचावर आगमन झाले. त्यानंतर सुमारे अडीच तास आपल्या अनोख्या शैलीतून त्यांनी आश्वीकरांची मने जिंकली.
संभाजी भगत यांच्या एकापेक्षा एक सरस अशा रचनांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ये हिटलर के साथी,जनाजो के बाराती, पुछते नही इन्सान को कौन है तू, पुछते है धर्म और जाती अशा एकापेक्षा एक शाहिरी गीतांनी विषमता, जातीभेद यावर आसूड ओढले. छत्रपती शिवरायांवर बाबासाहेब आटखिळे यांनी अंगावर शहारे आणले. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचेवरील गीतांनी महिलांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गर्दीमुळे संयोजकांना अधिकच्या स्क्रीन लाऊन गर्दीचे नियोजन करावे लागले. संयुक्त जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी प्रसिद्धीस हपापलेले नसल्याने बॅनरवर केवळ महापुरुषांचे फोटो लावल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सात उच्चशिक्षित डॉक्टर, सहा प्राध्यापक, चार कृषी पदवीधर, दहा शिक्षक, चार अभियंते, दोन वकील, एकवीस विद्यार्थी, पंचेचाळीस शेतकरी, दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, सहा कारागीर, महिला व मुली यांनी कठोर परिश्रम घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे, सचिव राजेंद्र मुन्तोडे व समन्वयक अनिल मुन्तोडे यांनी दिली.

