रविवार विशेष लेख (महाराष्ट्र संवाद न्यूज)
भारतीय राजकारणात काही व्यक्ती इतक्या बनेल झाल्यात की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही असेच व्यक्तीमत्व बनलं आहे. जगज्जेते आणि सर्वव्यापी असल्याने त्यांनी केलेली कोणतीही कृती ही दैवी देणगीच जणू. ते कोणालाही काहीही बोलले तरी ते शब्द फुलोरे आणि त्यांना कोणी काही बोललं तर तो द्रोह, त्या म्हणजे लाखोल्या. त्यांनी कसंही वागलं तरी तो दैवी चमत्कार, इतरांसाठी मात्र तो व्यंग ठरतो. त्यांच्या अवगुणांवर कोणी बोट ठेवलं की जणू देवावरचाच हल्ला. यामुळे इतरांनी पंतप्रधानांवर टीका करू नये. तो अधिकार केवळ आणि केवळ मोदींचा आणि त्यांच्या पक्षाच्या वाचाळांचाच. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात असाच प्रकार घडतो आहे. मोदींवर टीका केली म्हणून लाखोलींचे निमित्त केलं जातं. पण विरोधकांवरील टीकेची झोड मात्र शब्द फुलोर्यांचीच आरास होय. सगळीकडे खड्डे दिसू लागले की विरोधकांवर तुटून पडायचं, त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करायची, हा परिपाठ भाजपने सुरू केला आहे.
कर्नाटकच्या निवडणूक प्रचाराने घेतलेली रंगत आता भलत्याच मार्गावर येऊन ठेपली आहे. केलेल्या कामांच्या आधारे मतं मागण्याऐवजी सत्ताधारी भाजपने आपले भावनेचे पत्ते टाकण्याचं कारस्थान सुरू केलं आहे. आजवर काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराच्या नावाखाली मतं मागून झाली. हे तुणतुणं आता उपयोगी राहिलं नाही हे लक्षात येऊ लागल्यावर पुलवामापासून पठाणकोटसारख्या घटनांचा आधार घेत तर कधी पाकिस्तानला शिव्या घालत निवडणुका जिंकल्या.
कर्नाटकची सार्वत्रिक निवडणूक त्याहून वेगळी आहे. पत्त्यांचे डाव आता चालेनासे झाले आहेत. पाकिस्तानच्या नावाने मतं मिळवणं अवघड बनलं, शहरी नक्षलींचा वापर करणं अशक्य झालं. पुलवामासारखी घटना घडली तर लोकं जोड्याने हाणतील अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर आता लिंगायतांच्या नावाखाली मतं मागण्याचा आचरटपणा सुरू झाला आहे. यामागची सत्ताधार्यांची नाटकं आता लोकांना चांगली कळू लागली आहेत. यामुळे असे कोणतेही मार्ग यशस्वी ठरणार नाहीत, हे भाजपला कळून चुकलंय. याकरिताच आता किड्या, मुंग्या, विंचू आणि विषारी सापांचा आधार घ्यावा लागतो आहे. कोणीतरी कुठेतरी मोदींना विषारी साप म्हणाल्याचं निमित्त करत देशभर आंदोलन करायचं, लोकभावनेला हात घालत विषारी सापाच्या नावाने मतं मागण्याचे उद्योग भाजप करू लागला आहे.
भाजपत असे कमी वाचाळवीर नाहीत ज्यांनी आपल्या विरोधकांची बोळवण याहून खालच्या शब्दात केली नाही. विरोधी पक्षांवर खोटेनाटे आरोप करण्यासाठी असे असंख्य वाचाळवीर भाजपने पोसले आहेत. त्यांना मागे टाकतील असे प्रवक्ते म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, असे आहेत. आणि आयटी सेल तर त्यांना पुरेसं काम करत आहे. निवडणुकीच्या जाहीर सभांमधील भाषणं ही जुमलेबाजी असते असं सांगायचं आणि दुसरीकडे मतांसाठी याच भाषणांचा आधार घ्यायचा यासारखा दुटप्पीपणा भाजप नेतेच करू शकतात.
कर्नाटकच्या राजकारणात लोकशाहीच्या गप्पा मारणार्या भाजपने 100 कोटी रुपये मोजून काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांना विकत घेत सत्ता स्थापनेचा केलेला खेळ कर्नाटकी जनता विसरलेली नाही. आपण निवडून दिलेल्या आमदारांची अशी खरेदी केली जात असेल तर उठसूठ लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार भाजपला नाही, हे या राज्यातल्या सामान्यातल्या सामान्यांचं सांगणं आहे. सत्तेसाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे कर्नाटकच्या मतदारांना चांगलं ठावूक आहे. यामुळेच आता या निवडणुकीत कुठल्याच मुद्यांचा आधार भाजप घेऊ शकत नाही. यातून मग जाहीर सभांमध्ये विंचू, सापांची आणि आत्महत्या करणार्या प्राध्यापकाच्या मुलीची थोतांड गोष्ट सांगण्याची वेळ पंतप्रधान मोदींवर ओढावली आहे.
एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी किती सभा घ्याव्यात याला काही मर्यादा आहेत. यापूर्वी एक दोन सभा घेतल्या की पंतप्रधानांचं काम भागायचं. धोरणांची आखणी पंतप्रधानांच्या भाषणांमध्ये असायची. संबंधित राज्यासाठी आपण काय केलं आणि काय करणार आहोत. याशिवाय देशाच्या कल्याणासाठी आपण काय केलं इतकं सांगितलं तरी ते पुरेसं व्हायचं. आज मात्र अत्यंत सुमार कामांचा दाखला दिला जातो. त्याचाही काही उपयोग होत नाहीए. काहीही न करता ते केल्याचा आव आणून उपयोग नसतो. आधीच देश आर्थिक संकटात आहे. यातच लोकांचे रोजगार गेलेले. जीएसटीने अर्धेअधिक उद्योग देशोधडीला लागलेले. दीड लाख कोटींच्या कर्जाच्या खायित गेलेल्या उद्योगाला पोतड्या उघड्या करून दिल्या जात असल्याने प्रत्येकजण संशयाच्या जांजाळात आहे. अशा परिस्थितीत विंचू आणि सापांच्या नावे मतं मागण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.
पण आता मतदार हे विंचू आणि सापांपुढे पोहोचले आहेत. हे भाजपच्या लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी लिंगायतांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. लिंगायतांना चिथावणीची आणि अवमानाची भाषा केली की मतं मिळतील, अशी भाबडी अपेक्षा मोदींची दिसते आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा करणार्या, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून देणार्या भाजपची अशी अवस्था कर्नाटकमध्ये का व्हावी? याचा कधी अभ्यास त्या पक्षाचे नेते करणार आहेत की नाहीत? एक दोनदा मतदारांना खोटं बोलून आणि फसवून त्यांच्यावर राज्य करता येईल. पण अशी जुमलेबाजी सतत कोणी स्वीकारू शकत नाही, हे भाजप नेत्यांना कळेल तोच त्या पक्षासाठी सुदिन म्हणावा लागेल.
निवडणुका आल्या की नव्या मुद्यांची डोकी वर काढायची कला भाजपला चांगलीच जमली आहे. यातूनच पुलवामासारख्या घटना तो पक्ष पचवू शकला. सत्यपाल मलिक यांनी भांडाफोड केला नसता तर भाजपने कर्नाटकात काहीही केलं असतं आणि आलेल्या निवडणुका हातोहाथ जिकल्या असत्या. मात्र ते दिवस गेलेत. लोकं समजली जातात तितकी निर्बुध्द नाहीत. टीव्हीच्या माध्यमातून कितीही गैरप्रचार केला तरी सोशल मिडियाचं व्यासपीठ हे अधिक तत्पर आणि सडेतोड बनलं आहे. तिथे सगळ्यांनाच विकत घेता येणार नाही, हे भाजपच्या लक्षात आलेलं दिसतं. यामुळेच तिथे निर्बंध घालण्याचा घाट सुरू आहे.
मलिकार्जून खरगेंनी मोदींना विषारी सापाची उपमा दिली आणि इतका काहूर माजवला गेला की मोदी जणू सौजन्याचा पुतळाच ठरले. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा राजकीय प्रवास लक्षात घेतला तर त्यांच्या एकूणच वाटचालीचा लेखाजोखा हा सर्प दोषासारखाच होता हे अमान्य करण्यासारखं नाही. गुजरातची दंगल, त्यानंतर सत्तेसाठी काहीही करण्याची हुकमी चाल, आपल्याच सरकारमधले मंत्री हिरेन पंड्या यांची हत्या, न्यायमूर्ती लोया यांच्यासह आणखी दोन मंत्र्यांचा संशयास्पद मृत्यू, संजीव भट्ट यांचा तुरुंगवास या घटना कशाचं द्योतक आहे, हे एकदा भाजपच्या नेत्यांनी सांगावं.
पुलवामा आणि पठाणकोटच्या घटना तर विघातक कृत्याच्या सार्या मर्यादा मोडणार्या घटना होत्या. पंतप्रधान पदावरील व्यक्तीच या सगळ्या विघातकतेला जबाबदार असतो. विषारी साप या शब्दात बोलवण झाल्याने इतकं दु:ख वाटत असेल तर आपण आपल्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांसाठी कोणत्या शब्दांचा वापर केला हे भाजपने एकदा पडताळून पाहिलं तर आपल्याला दिलेली विषारी सापाची उपमा किती सामान्य होती, हे लक्षात येईल. राहुल गांधी यांच्यासाठी खालच्या दर्जाचे व्यक्त झालेले शब्दप्रयोग पाहिले तर मोदींना विषारी साप संबोधणं सामान्यच होतं.
सोनिया गांधी यांना बारगर्ल म्हणून हिणवणं ही तर भाजपच्या एकूणच संस्कृतीचा र्हास होता. भाजपचे नेते किती विकृत आहेत याचं प्रत्यंतर या किळसवाण्या वक्तव्यात होतं. त्यामानाने विषारी सापाची उपमा अगदीच सामान्य म्हणता येईल.
प्रवीण पुरो, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई

