संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणावरील “ऐसपैस शिक्षण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, लेखक सुनील माळी, प्रकाशक घनश्याम पाटील, सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार प्रकाश टाकळकर आदींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संगमनेरमधील पत्रकार उपस्थित होते.
चपराक प्रकाशनाच्यावतीने शिक्षणासंबंधीची बारा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्या मालेतील संदीप वाकचौरे यांचे हे चौथे पुस्तक आहे. संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाच्यावतीने यापूर्वी शिक्षणाचे दिवास्वप्न, शिक्षणाचे पसायदान, पाटी पेन्सिल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले आहे.
पुस्तकाला माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तर पाठराखण सेवानिवृत्त शिक्षण संचालक व बालभारतीचे भाषा विषयाचे माजी अध्यक्ष शिवाजी तांबे यांची लाभली आहे. आज समाजात अनेक समस्या अधिकाधिक बिकट होत चालल्या आहेत. त्यांची तीव्रता रोज माध्यमांतून समोर येत आहे. समस्या आहेत सार्वत्रिक बेशिस्तीच्या, वाढलेल्या हिंसेच्या, मूल्यांच्या अवमूल्यनाच्या, नागरिकत्वाविषयीच्या बेफिकिरीच्या, असंवेदनशीलतेच्या, मानवतेपुढे उभ्या राहिलेल्या अनेकविध प्रश्नचिन्हांच्या अनुषंगाने वेध घेण्यात आला आहे.
बिघडत चाललेल्या सामाजिक स्वास्थ्यामुळे लोक भांबावून गेलेत. शासन काही तात्कालिक उपाय शोधते पण ते पुरे पडताना दिसत नाहीत. अशा सर्व समस्यांचे मूळ बिघडलेल्या शिक्षणाच्या आरोग्यात आहे. समस्यांचा चिकित्सक उहापोह ‘ऐसपैस शिक्षण’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
त्यांचे हे पुस्तक व्यापक जन-उद्बोधनाची भूमिका बजावत आहे. समाजातील समस्यांची मूळे शिक्षण व्यवस्थेत कशी आहेत याचा त्यांनी या पुस्तकात अनेक अंगांनी वेध घेतलाय. ते केवळ समस्यांचा वेध घेऊन थांबत नाहीत तर त्यावर अनेक व्यावहारिक मार्ग सुचवते. शिक्षण जीवनाभिमुख कसे करता येईल, त्यामधून कालसुसंगत नागरिकत्वाची घडण कशी होऊ शकते यांसारख्या मुद्द्यांचे जागोजागी सोदाहरण विवेचन केले आहे.
समस्यांकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहण्यामुळे त्यांच्या प्रतिपादनात सकारात्मक प्रेरकता आढळते. नवीन शैक्षणिक धोरणातील नावीन्यपूर्ण बदलांमुळे अनेक चांगले बदल घडू लागतील असे वैशिष्ट्यपूर्ण असे हे पुस्तक आहे. प्रास्ताविक संदीप वाकचौरे यांनी तर आभार नितीन ओझा यांनी मानले.

