संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – स्वतःच्याच मेव्हण्याचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. अनैतिक संबंधातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे सिद्ध करण्यात साक्षीदार आणि सरकार पक्षाला यश आले नाही. किरण नानाभाऊ दुशिंग असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१ नोव्हेंबर २०१३ रोजी घडलेल्या या खून प्रकरणी न्यायालयाने १३ मे २०२३ रोजी निकाल दिला आहे. घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २ नोव्हेंबर २०१३ रोजी कोकणगाव परिसरातील सुकओहळाचे पाणी साठवलेल्या तलावामध्ये भाऊसाहेब दगडू गवांदे याचा मृतदेह आढळून आला होता. भाऊसाहेब याचा विवाह २८ ऑक्टोंबर २०१३ रोजी कोकणगाव येथील महादेव मंदिरात उंबरे ता. राहुरी येथील मंजुषा नानाभाऊ दुशिंग हिच्यासोबत साध्या पद्धतीने झाला होता. मंजुषा हिचा हा दुसरा विवाह होता. विवाहानंतर १ नोव्हेंबरला पोखरी हवेली येथे फिर्यादीच्या घरी लग्नानंतरच्या सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
या पूजेसाठी आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग व त्याचा मित्र सागर सुरेश धोत्रे उपस्थित होते. सायंकाळी फिर्यादीच्या घरासमोर जेवण सुरू असताना किरण दुशिंग याने मेव्हणा भाऊसाहेब याला नातेवाईकाच्या डाळिंबाच्या बागेत फिरून येऊ व नंतर जेवण करू असे सांगून त्याला सोबत आणलेल्या मित्रासोबत दुचाकीवर बसवून नेले मात्र त्यानंतर ते घरी परतले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब याचा मृतदेह कोकणगावच्या तलावात आढळून आला होता.
मृत भाऊसाहेब याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच्या फिर्यादी वडिलांना समजले की, किरण दुशिंग याचे त्याच्या सावत्र बहिणी सोबत पूर्वीपासून अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे आरोपीने मंजुषा हिचे पहिले लग्न सोडचिट्टी करून घेऊन मोडण्यास भाग पाडले होते. तर तिच्या दुसऱ्या लग्नास किरण याचा विरोध होता. परंतु त्याच्या विरोधाला न जुमानता त्याच्या आईने मंजुषा हिचा विवाह भाऊसाहेब याच्यासोबत लावून दिला होता. मंजुषा हिच्यासोबत चा अनैतिक संबंधांना अडथळा येऊ नये यासाठी किरण दुशिंग यांनी सागर धोत्रे यांच्या मदतीने भाऊसाहेब याला तलावाच्या पाण्यात बुडवून जीवे मारले अशा आशयाची फिर्याद दगडू गवांदे यांनी ४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिल्याने आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. आरोपीच्यावतीने ॲड. शरीफ पठाण व ॲड. मोहसीन खान यांनी काम बघितले. खटल्यातील प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी लक्षात घेत सरकार पक्षाला आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात यश आले नाही. साक्षीदारांच्या विसंगत साक्षी आणि परिस्थितीजन्य पुरावा पुरेसा नसल्याचा निष्कर्ष नोंदवत न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

