रविवार विशेष लेख
विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहर्याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहर्यातील समीर वानखेडे यांचा उपद्व्याप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे लिहिणारच आहोत. अशा सभ्य चेहर्यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरत होता. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर राज्याच्या पोलीस खात्यात कार्यरत होता, हेच या राज्याचं दुर्देवं आहे.
त्यातल्या त्यात मुंबईसारख्या प्रांतात या माणसाला पोलीस आयुक्त करणं तर महापाप. पण ते आमच्या राज्यकर्त्यांनी लीलया केलं. याच परमवीर यांच्यावरील सारे पाप विद्यमान सत्ताधार्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने एका रात्रीत धुवून काढले आहेत. या सिंग यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावरील आजवरच्या आरोपांची शहानिशा करायची झाली तर परमवीर यांचं निलंबन मागे का आणि कसं घेण्यात आलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्याविषयीच्या तक्रारी थेट लोकसभा अध्यक्षांबरोबरच देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यापर्यंत जात असतील तर त्याच्या एकूणच कारभाराची चौकशी होणं आगत्याचं असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना क्लिनचिट देत त्यांचा सेवाळाळ भरून देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय वादग्रस्त आहेच, पण राज्याच्या सभ्य प्रतिमेला आणि नैतिकतेने काम करणार्या अधिकार्यांवर अन्याय करणारा, त्यांचा अवमान करणारा, शिवाय सिंग यांनी आजवर केलेल्या अन्यायग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.
सिंग यांना क्लिनचिट देण्याच्या निर्णयाची पोलखोल करताना पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा संदर्भ दिला आहे. परमवीर यांच्या विरोधातील असंख्य तक्रारींची माहिती स्वत: ओम यांनी आपल्याला दिली आणि इतका भ्रष्टाचारी अधिकारी सेवेत राहू कसा शकतो, असा सवाल बिर्ला यांनी आपल्याला केल्याची माहिती पटोले यांनी दिली. तेव्हा राज्यात अॅन्टालियासमोर स्फोटकांची गाडी पार्क केल्याचं प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या अधिकार्याची अशी काही पाठराखण केली की राज्याचे गृहमंत्री कोण, असा सवाल तेव्हा विधानसभेच्या गॅलरीतल्या पत्रकारांना पडला होता.
देवेंद्र यांच्या या कृतीचा पोलखोल तेव्हा अध्यक्षीय खुर्चीवरून झाला तेव्हा परमवीर आणि देवेंद्र यांच्यातील सूत कळलं. निलंबनानंतर दर तीन महिन्यात पुनरावलोकन करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही शिंदे सरकारने आणि फडणवीसांच्या गृह खात्याने सिंग यांच्या निलंबाचं वर्षभरात एकदाही पुनरावलोकन केलं नाही. मॅटने सिंग यांच्या प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश देऊनही या सरकारने ते दिलं नाही. यामुळे मॅटने हे प्रकरण निकालात काढलं. आता तर त्याच सिंग यांना निर्दोषत्व बहाल करत फडणवीस यांनी सिंग यांना आघाडी सरकार पाडण्यातल्या भागीदारीचं बक्षीस दिलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कर्दनकाळ म्हणून ज्या काहींचा उल्लेख केला जातो त्यात सिंग यांचा समावेश आहे. हे सरकार राज्याच्या सत्तेवर येताच या सरकारला पायउतार करण्यासाठी फडणवीस कंपूने अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केलं. फडणवीसांच्या या राजकारणात परमवीर यांच्यासारखा बदमाश अधिकारी सामील होणं म्हणजे चोरांच्या टोळीत एका चोराची भर होती. सिंग यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या असंख्य आरोपांची दखल घेत महाविकास आघाडीने आणि त्या सरकारचे गृहमंत्री असलेल्या अनील देशमुख यांनी सिंग यांच्याकडील मुंबईचं पोलीस आयुक्तपद काढून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि सरकारमधील गृहमंत्री अनील देशमुख हे सिंग यांचे दुष्मन बनले. दुष्मनाचा दुष्मन हा आपला मित्र असतो, तशी त्यांची गट्टी महाविकास आघाडीचे विरोधक असलेल्या देवेंद्र फडणवीसांशी झाली. आपल्या अपेक्षेप्रमाणे सिंग काम करत असल्याचं पाहून देवेंद्र यांनी केंद्राच्या मदतीने सिंग यांचे सारे दरवाजे मोकळे करून दिले. यानंतरच गृहमंत्री अनील देशमुख यांच्या विरोधात 100 कोटींच्या वसुलीचे आरोप सुरू झाले. याबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी करण्यात आली. ईडीने याचा गैरफायदा घेतला आणि देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आता या आरोपात तथ्य नसल्याची बाब पुढे आली आणि देशमुखांना जामीन मिळाला.
देशमुखांचं हे प्रकरण घडण्याआधी मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या इमारतीच्या परिसरात जिलेटीन या स्फोटकांची गाडी पार्क केल्याचं प्रकरण पुढे आलं होतं. कमाईचा हा बनाव इतका गंभीर होता की यात जो कोणी असेल त्याच्याविरोधात देशद्रोहासारखाच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण त्या प्रकरणाची साधी चौकशी झाली नाही. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने ममं बोलावं असे सोपस्कार केले. आवश्यकता असूनही चौकशी झाली नाही. मुकेश अंबानी यांना त्यांच्या विविध उद्योगांकडे जाण्यासाठी अॅन्टेलियावरून हॅलिकाप्टर उडवण्याची परवानगी हवी होती. या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता करून घेण्याची जबाबदारी सचिन वाझे या आणखी एका बदमाश पोलीस अधिकार्याकडे होती. यासाठी स्फोटकांची गाडी अॅन्टेलियाच्याजवळ पार्क करण्याचा बनाव रचण्यात आला. अंबानी यांच्या जिविताला धोका आहे, असं भासवून मुंबई पोलिसांच्या अहवालाच्या आधारे अॅन्टेलियावरून हॅलिकाप्टर उडवण्याची परवानगी मिळवायची होती, असा हा प्लान होता. यात वाझे आणि सिंग यांची कित्तेक कोटींची कमाई दडली होती. ज्यात पुढे मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत सापडला आणि सारा प्लान फसला.
अॅन्टेलियाच्या परिसरातील स्फोटकांचा बनाव इतक्या सोपस्काराने पुढे केला जात होता, आणि फडणवीस यांच्याकडून ज्या पध्दतीने विधानसभेत माहिती दिली जात होती ती पाहाता तयार केलेली स्क्रीप्टच फडणवीस वाचतात की काय, असं वाटत होतं. असाच शेरा तेव्हा अध्यक्षीय खुर्चीवरून पटोले यांनी फडणवीस यांना मारला होता. अॅन्टेलियासमोर मिळालेले वाहन, या वाहनाचा मालक असलेल्या मनसुख हिरेनचा खाडीत मिळालेला मृतदेह, त्याचा करण्यात आलेला पंचनामा गृहखात्याशी अंतर्गत असलेल्या बाबी जशाच्या तशा विधानसभेत फडणवीस यांनी उभ्या करताना वाझे हा उध्दव ठाकरेंचा माणूस असल्याचं सांगायला फडणवीस कचरले नाहीत. याच वाझेच्या हातून काळे धंदे करणार्या सिंग यांना वाचवणार्या फडणवीसांचे तेव्हाचे बोल आठवू लागले आणि हा कट किती घातक होता हे स्पष्ट होतं. पुढे गृहमंत्र्यावरही खोटे आरोप करत या अधिकार्याने महाराष्ट्राची उभ्या देशात बदनामी केली. भ्रष्टाचाराचा खोटा आरोप होत असताना फडणवीस खुशीत गाजरं खात होते. त्या आरोपात तथ्य नाही, हे आता स्पष्ट होत असताना सिंग यांना क्लिनचिट दिली जात असेल तर महाराष्ट्राच्या भल्याची तरी लाज या सत्ताधार्यांना आहे की नाही, असा साधा प्रश्न आहे. महाराष्ट्राशी द्रोह करणार्या या अधिकार्याची पाठराखण करण्याच्या शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राचा अवमान केला आहे. परमवीर यांनी केलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्या. कैलास चांदिवाल आयोगाने पुढे सिंग आणि वाझे उघडे पडल्यावर अनील देशमुख यांनी पैसे वसुलीचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं त्यांना कबूल करावं लागलं. यावरून या दोघांनी केलेल्या आरोपांमागे केवळ सरकारच्या बदनामीचं सत्र असल्याचं स्पष्ट झालं.
ज्या परमवीर यांना क्लिनचिट देण्यात आली त्या सिंग यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींची शहानिशा झाली असती तर कोणाही शहाण्याने त्यांना निर्दोष सोडलं नसतं. जे आरोप झाले ते ही गंभीर आणि पोलीस दलाची गरीमा घालवणारे असल्याने या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हायलाच हवी. गावदेवी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी सिंग यांच्या विरोधात केलेले आरोप तर अतिशय गंभीर आहेत. एका पबवर कारवाई केल्याचा प्रसाद सिंग यांनी डांगे यांना निलंबित करून दिला. ही कारवाई टाळण्यासाठी शार्दूल बायास नामक परमवीर यांचा चुलतभाऊ बनलेल्या व्यक्तीमार्फत डांगे यांच्याकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. नंतर निलंबन मागे घेण्यासाठी 2 कोटींची मागणी केल्याचा आरोप डांगे यांनी लेखी पत्राद्वारे केला होता.
अकोल्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनीही सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परमवीर यांच्या पत्नीचं इंडिया बूलमध्ये कार्यालय कसं आलं इथपासून त्यांच्या रोहन नामक मुलाला सिंगापूरपर्यंत उद्योग केवळ भ्रष्ट पैशातून झाल्याचा आरोप केला जात होता. नवी मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये सिंग यांच्या विरोधात खंडणी वसुलीच्या आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गोरेगावचे व्यावसायिक बिमल अगरवाल खंडणी वसुलीप्रकरणाचा एफआयआर मुंबईत आहे. भाईंदरचे बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांनीही सिंग यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. ठाण्यात केतन तन्ना यांच्या एफआयआरने सिंग यांच्यावर गंभीर बोट ठेवलं आहे. या बरोबरच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाले तेव्हा ते काही महिने फरारीही होते. ते सापडत नसल्याने त्यांना अखेर फरार घोषित करण्याची वेळ न्यायालयावर आली. या प्रकरणांच्या चौकशीसाठी देवाशिष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमण्यात आली या समितीने दिलेल्या अहवालानंतर असंख्य आरोपांची मालिका असलेल्या सिंग यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच परमवीर यांना निलंबित काळातील वेतन आणि इतर भत्ते देण्याची घोषणा करून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रावर अनंत उपकारज्ञ केले आहेत.
प्रवीण पुरो, मुंबई

